“हर घर तिरंगा” मोहिमेत व्यत्यय ; ध्वज सदोष ; सरपंचांची पं. स. ला धडक

सरपंचांनी गटविकास अधिकारी आणि पुरवठादाराला विचारला जाब ; भाजपा पदाधिकारी उपस्थित

मालवण | कुणाल मांजरेकर

केंद्र सरकारच्या वतीने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” मोहिम राबवली जात आहे. या अंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या अभिनव मोहीमेत व्यत्यय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हर घर तिरंगा उपक्रमासाठी मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींना पंचायत समिती मार्फत पुरविण्यात आलेल्या तिरंगा झेंड्यांपैकी बहुतांश झेंडे हे नित्कृष्ट दर्जाचे असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या सरपंचांनी बुधवारी पंचायत समितीत धडक देत हे सर्व झेंडे परत करत गटविकास अधिकारी व पुरवठादार यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतींनी झेंड्यांचे पैसे भरूनही नित्कृष्ट दर्जाचे झेंडे पुरविले जात असून ग्रामपंचायतींनी नित्कृष्ट झेंडे वाटायचे का? जनतेने असे चुकीचे झेंडे लावायचे का ? लोकांना आम्ही काय उत्तर द्यायचे ? लोकांनी आपल्या घरी तिरंगा फडकवायचा कसा ? असे प्रश्न सरपंचांनी उपस्थित करत या झेंड्यांची जबाबदारी पंचायत समितीनेच घेऊन आवश्यक झेंडे तातडीने पुरवावे अशी मागणी केली.

दरम्यान, याबाबत भाजप पदाधिकारी, सरपंच व गटविकास अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेत पंचायत समितीने या सर्व तिरंगा झेंड्यांची शहानिशा करून त्यातील नित्कृष्ट व चुकीचे तिरंगा झेंडे पुरवठादराने परत घेऊन नवीन झेंडे पुरवावेत असे ठरविण्यात आले. त्यामुळे या वादावर पडदा पडला.

मालवण पंचायत समितीकडून ग्रामपंचायतींना पुरविण्यात आलेले तिरंगा झेंडे नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आल्याने तालुक्यातील सरपंचांनी पंचायत समितीत धाव घेत झेंडे परत केले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, सरपंच संघटना अध्यक्ष तथा हडी सरपंच महेश मांजरेकर, कोळंब सरपंच सौ. प्रतिमा भोजने, आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर, आचरा सरपंच प्रणया टेमकर, देवली सरपंच गायत्री चव्हाण, देऊळवाडा सरपंच अदिती मेस्त्री, बिळवस मानसी पालव, हेदूळ सरपंच नंदू गावडे, सर्जेकोट सरपंच नीलिमा परुळेकर, तोंडवळी सरपंच आबा कांदळकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी सरपंचांनी गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर यांना जाब विचारला. काही ग्रामपंचायतींनी तिरंग्यासाठी आधीच पैसे भरून झेंडे मागविले होते. मात्र पंचायत समितीने वितरित केलेले झेंडे नित्कृष्ट दर्जाचे आहेत. ध्वज संहिता डावलून अनेक झेंडे चुकीच्या आकाराचे, फाटलेले, डाग असलेले तसेच अशोक चक्र मध्य ठिकाणी नसलेले, तिन्ही रंगांच्या पट्ट्या भिन्न आकाराच्या असलेले असे आहेत. ग्रामपंचायतींनी जनतेला मोफत तिरंगा देण्याचे आश्वासन दिले असून असे नित्कृष्ट झेंडे असतील तर झेंडे कसे वाटायचे ? लोकांनी चुकीचे झेंडे लावायचे का ? असे सवाल महेश मांजरेकर व इतर सरपंचांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. यावेळी पुरवठादारासही धारेवर धरत मागणी प्रमाणे ध्वज संहितेप्रमाणे असणाऱ्या सुयोग्य झेंड्यांचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे सरपंचांनी सांगितले.

याबाबत भाजपचे अशोक सावंत, बाबा परब, धोंडू चिंदरकर यांनीही नाराजी व्यक्त करत तिरंगा ही आपली अस्मिता असून नित्कृष्ट झेंडे ही गंभीर्याची बाब असून पंचायत समितीने पुरवठादाराकडून ग्रामपंचायतीना झेंड्यांचा पुरवठा करताना यावर देखरेख ठेवणे गरजेचे असल्याचे गटविकास अधिकारी श्री. गुजर यांना सांगितले. चांगले झेंडे पुरविण्याची जबाबदारी ही पंचायत समितीची असून ग्रामपंचायतींनी परत केलेल्या झेंड्यांचे पंचायत समिती प्रशासनानेच वर्गीकरण करून नित्कृष्ट झेंडे बाजूला करून ते पुरवठादारास परत करावेत व त्या बदली पूर्वठादाराने नवीन चांगले झेंडे द्यावेत असे यावेळी झालेल्या चर्चेतून ठरविण्यात आले. यास पुरवठादारानेही सहमती दर्शविल्याने या वादावर पडदा पडला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!