मालवण शहर शिवसेनेत भूकंप ; माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा राजीनामा

पत्रकार परिषदेत प्रसिध्दीपत्रक देऊन शिवसेनेला दिली सोडचिठ्ठी ; अधिक बोलण्यास नकार

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण शहर शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. मागील पाच वर्षे मालवण शहराचे नेतृत्व करणारे मावळते नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी बुधवारी सकाळी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक प्रसारमाध्यमांना देताना या विषयावर कोणतेही भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. येत्या काही कालावधीत मालवण नगरपरिषदेची निवडणूक होणार असताना ज्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने नगरपालिकेचा कारभार केला, त्या तत्कालीन नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.

महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रक देऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळीI त्यांच्या पत्नी सौ. स्मृती कांदळगावकर या देखील उपस्थित होत्या.

या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कुठलीही राजकीय पाश्वभूमी नसताना नगरपरिषदेतील प्रशासकीय अनुभवावर गेली पाच वर्षे नगराध्यक्ष या प्रतिष्ठेच्या खुर्चीवर बसवल्याबद्दल मालवणच्या जनतेचे आणि शिवसेना पक्षाने आपल्या पक्षातून ही संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल या सर्वांचे मनापासून आभार मानतो. कुठलीही राजकीय स्पर्धा, शह काटशह मनात न ठेवता आपल्याला दिलेल्या पाच वर्षाच्या कालावधीत मालवण शहराचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयन्तशील राहिलो. हे करत असताना अनेक आरोप प्रत्यारोप झाले. पण हा राजकारणाचा एक भाग मानून याला उत्तर प्रत्युत्तरात वेळ न घालवता तसेच प्रसिद्धीच्या मागे जास्त वेळ फुकट न घालवता जास्तीत जास्त मालवण शहराच्या विकास कामाकडे लक्ष दिले. चांगले काम करणाऱ्या व्यक्तीवर आरोप होणार आणि काम करणाऱ्याकडून चुका होणार हे सर्वश्रुत आहे. पण हे करत असताना मालवणच्या जनतेची आणि माझ्या पक्षाची मान खाली जाईल अस कुठलही काम मागच्या पाच वर्षात केले नाही. मालवणच्या नगरपालिकेत राजकीय विरहित काम करताना एक दोन वेळा सभागृहात मतदानाचे ठराव वगळता मागील पाच वर्षात सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात यश आले. विरोधकांच्या प्रभागात पण लाखो रुपयांची कामे करण्यात आली आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून विरोधी पक्षाच्या चार नगरसेवकानी शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यामुळे पक्षाची ताकद वाढवली.

रस्ते, गटार स्वच्छता या मूलभूत सोयी बरोबरच मालवणचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टिने कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. यामध्ये रॉक गार्डन येथे डेकोरेटिव्ह लाईट म्युझिकल फाऊंटन, चिवला बीच येथे डेकोरेटिव्ह लाईट, आडारी गणपती मंदिर येथील सुशोभीकरण हॉटेल सायबा नजीकच सुशोभीकरण, मालवण नगर परिषद आणि त्याचा परिसर सुशोभीकरण, पर्यटकांना उपयुक्त असे दिशा दर्शक फलक, बायोटॉयलेट, मामा वरेरकर नाट्यगृह येथे सुसज्ज असा एसी मल्टिपर्पज हॉल, अग्निशमन इमारत, सुसज्ज अशी भाजी मार्केट इमारत, न. प. सफाई कामगार यांच्या साठी बीओटी तत्वावर निवास व्यवस्था ही कामे करण्यात आली. बंद असलेल्या भुयारी गटार योजनेला शासनाकडून अनुदान प्राप्त करून घेऊन ते काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न केले. मालवणच्या नळपाणी योजनेला बरीच वर्षे झाल्याने त्या ठिकाणी सुमारे ४५ कोटी रुपयांची नवीन नळपाणी योजना प्रस्तावित करण्यात आली असून लवकरच त्याला अंतिम मंजुरी प्राप्त होणार आहे. कोकणातील पहिल्या प्रथम २५ कोटी रुपयांचा मत्स्यालयाचा प्रस्ताव शासन दरबारी अंतीम मंजुरीसाठी सादर आहे.

अश्या प्रकारे गेल्या पंधरा वर्षात झाली नसतील एवढी कामे या पाच वर्षात करण्यात आली. अर्थात यासाठी शासन दरबारी मंजुरी आणि निधी आमचे आमदार, खासदार, पालकमंत्री, मंत्री यांच्या पाठपुराव्याशिवाय शक्य झाले नसते ही वास्तुतिथी आहे. मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनाचे संकट, तोक्ते वादळ यामुळे विकास कामाना अनेक अडचणी आल्या. कामे मुदतीत पूर्ण करता आली नाही हे नाकारता येणार नाही. पण सद्यस्थितीत बरीचशी कामे पूर्ण झाली आहेत आणि काही कामे पूर्णत्वाकडेआहेत.

टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यात आली. त्यामूळे मागील पाच वर्षात बिलो टैंडर मंजुरीतुन जवळपास ६० ते ७० लाख रुपयाची शासनाच्या निधीची बचत करण्यात आली. मालवणच्या विकासकांना मालवण न. प. तर्फे पूर्णपणे सहकार्याची भूमिका ठेवल्यानेच आज मालवण मध्ये अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत आणि मालवणच्या सौंदर्यात भर पडली आहे. परंतु मागील पाच वर्षे मालवण चा विकास हा एकमेव अजंडा घेऊन काम करत असताना माझा कुटूंबाकडे, आरोग्याकडे व्यवसायाकडे दुर्लक्ष झाला. त्यामुळे यापुढे पक्षाच्या कामाला पुरेसा वेळ देणे शक्य होईल अस वाटत नाही. त्यामुळे या कारणास्तव मी आज पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहे. माझ्या कालखंडात मालवणच्या विकासासाठी पक्षाने जे सहकार्य केले, त्याबद्दल मालवण वासीयांच्या वतीने मी ऋणी राहीन. यापुढेही मालवण वासीयाचे कुठलेही प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल. तसेच जर चांगल्या कामाचे श्रेय जर मला मिळत असेल तर काम करताना नकळत काही चुका झाल्या असतील तर झालेल्या चुकांची आणि याला उत्तर देण्याची जबाबदारी पण माझीच राहील, असे श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!