३४११.१७ कोटी खर्चाच्या वैभववाडी – कोल्हापूर प्रस्तावित रेल्वेमार्गाला गती मिळणार

पीएम गतीशक्ती अंतर्गत ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाकडून शिफारस करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांच्या ६ प्रकल्पांत वैभववाडी – कोल्हापूर प्रस्तावित रेल्वेमार्गाचा समावेश

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या वैभववाडी ते कोल्हापूर प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पीएम गतीशक्ती अंतर्गत ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाकडून पायाभूत सुविधांच्या ६ प्रकल्पांची शिफारस करण्यात आली असून यामध्ये ३४११.१७ कोटी खर्चाच्या वैभववाडी – कोल्हापूर प्रस्तावित रेल्वेमार्गाचा समावेश आहे. याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.

पीएम गतिशक्ती अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय नियोजन गटाची (एनपीजी) ५३ वी बैठक उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (DPIIT) लॉजिस्टिक्स सचिव सुमिता दावरा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील वैभववाडी-कोल्हापूर या ३४११.१७ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाची देखील शिफारस करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गामुळे इतर उद्योगांव्यतिरिक्त या भागातील विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी औष्णिक कोळशाच्या वाहतुकीला मदत मिळणार आहे. या भागातील पर्यटन आकर्षणाव्यतिरिक्त उद्योगांचे नव्या पायाभूत सुविधांच्या कनेक्टिव्हिटी संदर्भात मूल्यमापन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, चर्चा झालेले हे प्रकल्प सामाजिक आर्थिक विकासाकरता मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी पुरवतील आणि सध्या अस्तित्वात असलेल्या शहरी आणि रेल्वे पायाभूत सुविधांवरील ताण कमी करतील असे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (DPIIT) लॉजिस्टिक्स सचिवांनी अधोरेखित केले. हे प्रकल्प भविष्यकालीन क्षमतावृद्धीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि प्रकल्पक्षेत्राच्या लॉजिस्टिक्स क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. या बैठकीत ३ रेल्वे प्रकल्प आणि ३ रस्ते प्रकल्प अशा एकूण २८,८७५.१६ कोटी रुपयांच्या सहा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले. या निर्णयाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्वागत केले असून केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व महाराष्ट्राच्या कोटयवधी जनतेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!