नियमबाह्य पद्धतीने बीएसएनएल टॉवरची जागा बदलल्यास गप्प बसणार नाही…

भाजपा नेते माजी खा. निलेश राणे यांचा दुरसंचार अधिकाऱ्यांना इशारा ; सावंतवाडी कार्यालयावर धडक

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात बी. एस. एन. एलच्या टॉवर्सची उभारणी सुरू आहे. मालवण तालुक्यात महान व अन्य गावात बीएसएनएलचा टॉवर्ससाठी सर्व्हे झाला. ग्रामपंचायत व प्रशासन स्तरावर जागा निश्चित झाली. मात्र, काही ठिकाणी निश्चित केलेल्या जागी टॉवर उभारणी न करता विनायक राऊत आणि वैभव नाईक अन्य ठिकाणी टॉवर उभारणी करण्याचा प्रयत्न आहेत. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने टॉवरच्या जागा बदलल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांना दिला.

निलेश राणे यांनी शुक्रवारी सावंतवाडी येथील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बीएसएनएल निकषानुसार मध्यवर्ती स्वरूपातील ज्या जागा मंजूर झाल्या, त्याच जागी टॉवर्स झाले पाहिजेत. सोमवार पर्यंत सर्व दुरुस्त्या व्हायला हव्यात. नियमात आहे तेच व्हावे ही आमची भूमिका आहे. आम्ही नियमाच्या बाहेर मागत नाही. मात्र, विनायक राऊतसाठी लोकेशन बदलणे हे चुकीचे आहे. विनायक राउत जेथे जेथे उद्घाटन करतात ते टॉवर्स चालू होत नाही. याचा अभ्यास करा. ते नियमाच्या बाहेर जाऊन टॉवर्सच्या जागा बदलायला सांगत आहेत. पण आम्ही नियमात आहे तेच सांगत आहोत. त्यामुळे दिलेल्या जागेवरच टॉवर्स झाले पाहिजेत, असा आक्रमक पवित्रा निलेश राणे यांनी घेतला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या टॉवरचे श्रेय खासदार राऊत व आमदार वैभव नाईक घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अधिकारी वर्गाने कुठल्याही दडपणाखाली येण्याची गरज नाही. थांबलेल्या टॉवर्सची कामे तत्काळ सुरु करा. असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपस्थित माजी सभापती सुधीर साळसकर व महान गावातील ग्रामस्थानीही आक्रमक भूमिका मांडली. अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम करावे. अधिकारी वर्गाच्या कारभारामुळेच गावात वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे गावाने सुचवलेल्या व सर्व्हे मध्ये निश्चित करण्यात आलेल्या जागीच टॉवर उभारणी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी सभापती सुधीर साळसकर, आनंद शिरवलकर, महान गावचे उपसरपंच अजित राणे, युवा मोर्चा सरचिटणीस बंटी पुरोहित, महान ग्रा. प. सदस्य प्रसाद जाधव, दिलीप भालेकर, बांदा उपसरपंच जावेद खतिब, ज्ञानेश्वर सावंत, गुरू सावंत, ज्ञानेश्वर पाटकर, साईनाथ जामदार, गुरू मठकर, सागर शिंदे, अशोक जाधव, संग्राम साळसकर, मंगेश साळसकर, रवींद्र साळसकर, सुरेश घाडी, अजय तावडे, संतोष शिंदे, मदन घाडी, अनिल सावंत, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

दरम्यान, भारत संचार निगम लिमिटेडच्या टॉवरची उभारणी जिल्ह्याभरात सुरु आहे. संबंधित ठिकाणी टॉवर उभारले जात असताना मंजुरीपूर्व सर्व्हे वगळून अन्य ठिकाणी टॉवर उभारणी केली जात असल्याच निदर्शनास येत आहे. विशेषतः कुडाळ मालवण तालुक्यातील बीएसएनएल टॉवरची कामे हेतुपुरस्सर थांबविल्याचे किंवा झालेला सर्व्हे व प्रत्यक्षात होणारे काम यात तफावत आढळत आहे. कुडाळ व मालवण तालुक्यात आपल्या ज्या बीएसएनएल टॉवरची उभारणी वर्षभरापूर्वी झालेली आहे ते अद्याप कार्यान्वित झालेले नाहीत. त्या शिवाय नवीन मंजुर झालेल्या टॉवरच्या कामांनाही अद्याप सुरुवात नाही. आपल्या अश्या कारभारामुळे कुडाळ व मालवण तालुक्याचा ग्रामीण भाग संपर्काबाहेर असून सर्वसामान्यांना नाहक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरी सद्यस्थितीत उभारणी पूर्ण झालेले टॉवर त्वरित कार्यान्वित करावेत. या सोबतच नव्याने मंजूर झालेले बीएसएनएल टॉवर देखील आपल्या यंत्रणेमार्फत ज्या ठिकाणचा सर्व्हे आहे त्याच ठिकाणी उभारणी वरुन कार्यान्वित करावेत, अशी आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3499

Leave a Reply

error: Content is protected !!