शिवसेना ठाकरे गटाचं सामाजिक दायित्व : शिवजयंतीचं औचित्य साधून ओवळीयेच्या सिद्धगडावर स्वच्छता मोहिम

आडवली – मालडी विभागाचा उपक्रम ; आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून गडाची केली पाहणी

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवजयंतीचं औचित्य साधून शिवसेना ठाकरे गटाच्या आडवली – मालडी जि. प. विभागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामाजिक दायित्व दाखवून दिलं आहे. समुद्रसपाटी पासून १ हजार ५४ मीटर उंचीवर असलेल्या मालवण तालुक्यातील ओवळीये गावच्या सिद्धगडावर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेप्रसंगी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून सिद्धगडाची पाहणी केली. या गडावर रविवारी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी आडवली मालडी विभागप्रमुख बंडू चव्हाण, उपविभागप्रमुख अंबाजी सावंत, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत, ओवळीये सरपंच रंजना पडवळ, उपसरपंच संजय पडवळ, असरोंडी उपसरपंच आदित्य सावंत, सरदार बाळा सावंत, प्रकाश खांदारे, सुनील सावंत, पप्पू कुलकर्णी, गोट्या गावडे, दीपेश खेडेकर, सदानंद सावंत, सचिन परब, विवेक गावडे, संदीप सावंत, दया कदम, प्रमोद सावंत, जीवनकुमार यादव, सुनील असरोंडकर, विनायक सावंत, अमोल गावडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

ओवळीये गावी असलेल्या शिवकालीन सिद्धगडाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा गड समुद्रसपाटी पासून १ हजार ५४ मीटर उंचीचा आहे. याठिकाणी सिद्ध ब्राम्हण महापुरुषाचे मंदिर आहे. नवनाथांच्या पदस्पर्शाने सिद्ध झालेला हा गड सिद्धी प्राप्तीसाठी तपश्चर्येचे ठिकाण म्हणून पावन झाला. अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना या दिनी छत्रपती शिवाजी महाराजांनी या सिद्धगडावर दुर्गा देवीची पूजा करून घटस्थापना केली. या गडावर घटस्थापना करताना एकाच गावात तो घट नसावा तर समाज बांधणीच्या हेतूतून साडेसतरा खेडयांचा घट म्हणून त्याला मान्यता प्राप्त झाली. शिवरायांनी हा गड ताब्यात घेतल्यानंतर या गडाची डागडुजी केली. याठिकाणी सभामंडप बांधले. धान्याचे कोठार बांधले, गन्हेगाराला ठेवण्यासाठी तुरुंग बांधला. भुयारी मार्ग तसेच घोडयांना पाण्यासाठी तळी बांधली. सागरी प्रदेशातील टेहळणी या गडावरून केली जात असे. सिंधुदुर्ग किल्ला, मसुऱ्याचा भगवंतगड, रामगड या गडांवर सिद्धगडावरून टेहळणी ठेवून संपर्क साधला जात असे. अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना या दिवशी ओवळीये गावचे पाच मानकरी आणि गोसावी बांधव या गडावर जातात. ओवळीये गावच्या रामेश्वराच्या कौल प्रसादी हुकुमान्वये सिद्धगडावर घटस्थापना केली जाते. तीन वर्षांनी एकदा ओवळीये गावचे ग्रामदैवत गडावर भेट देते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!