… तर मालवण नगरपालिकेवर कोणती कारवाई करायची ?

भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांचा सवाल

मालवण : मालवण नगरपालिकेने कचरा उघड्यावर टाकणे, उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. स्वच्छ शहरासाठी अशी कार्यवाही करणे बरोबरच आहे. पण दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी परिस्थिती मालवण न. पा. ची झाली आहे. शहरातील गोळा केलेला कचरा सागरी महामार्ग येथे खाजगी जागेत टाकला जात आहे. या कचऱ्याला सायंकाळची आग लावली जात आहे. हे नियमात आहे का? यामुळे सागरी महामार्गावर पूर्णपणे दुर्गंधी पसरली असून लावलेल्या आगीमुळे धुराचा मोठ्या प्रमाणात विषारी प्रादुर्भाव भागात होत असताना दिसत आहे. असे असताना नगरपालिकेवर कोणी कारवाई करायची ? असा सवाल भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

मालवण नगरपालिकेत भाजपा सत्तेत होती तेव्हा पहिले काम मालवण शहर स्वच्छतेचे घेतले होते. त्यावेळचे आरोग्य सभापती परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांनी दोन वर्षात शहर स्वच्छतेसाठी जातीनिशी लक्ष घालून नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा मालवण डम्पिंग ग्राउंड स्वच्छ केले होते. १५० डंपर कचरा डम्पिंग ग्राउंड मधून बाहेर काढला तो कचरा खाजगी जागेत परवानगी घेऊन टाकला होता. पण या कचऱ्यामुळे कोणतीही दुर्गंधी किंवा नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता प्रशासनाला घ्यायला लावली होती. प्रशासनाकडून आता अशी काळजी का घेतली जात नाही ?डम्पिंग ग्राउंड मध्ये कचरा विघटन व्यवस्था कार्यान्वित केली होती, ती पुढे का सक्षमपणे राबवली गेली नाही ? दोन वर्षात पहिले होते तसेच डम्पिंग ग्राउंड पूर्ण कचऱ्याने भरले आहे. आजूबाजूच्या परिसरात पूर्णपणे दुर्गंधी पसरली असून भटकी जनावरे हा कचरा रस्त्यावर आणून घाण करत आहेत. सागरी महामार्गावर असेच कचऱ्याचे घाणीचे साम्राज्य असून सॅनिटरी पॅड, हगीज सारखी पॅड भटके कुत्रे नागरिकांच्या परिसरात टाकून घाण करीत आहेत. ज्या डम्पिंग ग्राउंडमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी भेट देऊन कामाची प्रशंसा करून चहा पिऊन गेले होते, त्याच डम्पिंग ग्राउंड मध्ये आता आतमधे जाता ही येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मालवण शहरातील शोच टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. उपलब्ध जागा पूर्ण भरली असून घाण बाहेर येत आहे. खाजगी जागेतच खड्डा मारून याचे विघटन केले जाते हे विघटन करणे बरोबर आहे का ? मालवण शहर स्वच्छतेसाठी घेतलेल्या नवीन कचरा गाड्या दोन वर्षातच नादुरुस्त कशा झाल्या की जाणून-बुजून ठेकेदाराच्या फायद्यासाठी नादुरुस्त केल्या गेल्या का ? लाखो रुपये खर्चून कचऱ्याचे विघटन विद्युत प्रकल्प बंद का? याबाबत प्रशासन चौकशी करणार की नाही ? दोन वर्षात कचरा विघटनावर ४० ते ४५ लाख रुपये खर्च करूनही डम्पिंग ग्राउंड कचऱ्याने भरलेले कसे ?मालवण न .प. चे फक्त ऑनलाईन सर्वेक्षण ऑनलाइन तक्रार निवारण न करता प्रत्यक्ष नियोजन करणे आवश्यक आहे. वाढीव दराने दिलेले कचरा ठेका तरी ठेकेदार कामगारांचे पगाराचे पगार न देता ठेका का सोडतो . त्याच्यावर कारवाई का होत नाही याची पण उत्तरे प्रशासनाने दिली पाहिजेत. मागील तीन वर्षात न. पा. मध्ये भाजपा सत्तेपासून दूर असल्यापासून पालिका आरंभशून्य एक कलमी कार्यक्रम राबवताना दिसत आहे. मालवण शहरात सुरू केलेला एकही प्रकल्प यशस्वी पणे पूर्णत्वास नेता आला नाही. मालवण शहरात सुरू केलेला विकास कामाचा निधी फक्त दोन-तीन वार्डात कार्यान्वित करून इतर जनतेला वेठीस धरण्याचे काम मालवण प्रशासनाने केले आहे . कचऱ्याबाबत व नियमाचे पालन करण्यासाठी आवश्यक ती कारवाई आपण जरूर करावी. पण आपणही नियमात वागावे. मालवण शहराच्या विकासासाठी भाजपा कायम मालवण नगरपालिकेच्या प्रशासनाबरोबर शंभर टक्के उभी राहणार आहे, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!