समुद्राला श्रीफळ अर्पण करून मालवणात शिवकालीन नारळी पौर्णिमा उत्सव साजरा

सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे नागरिक, व्यापारी वर्गाचा हिरमोड

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेला मालवणचा नारळी पौर्णिमा उत्सव गुरुवारी मालवण बंदर जेटी नजीकच्या समुद्र किनाऱ्यावर साजरा झाला. जोरदार पाऊस व वारा यामुळे नारळी पौर्णिमा उत्साहावर काहीसे विरजण पडले. मात्र भर पावसातही व्यापारी आणि नागरिकांनी समुद्राला नारळ अर्पण करून “दर्याराजा, शांत हो” असे साकडे घातले.

मालवण शहरात साडेतीनशे वर्षा पासून सुरु असलेली इतिहासकालीन नारळी पौर्णिमेचा उत्सव गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधा नंतर यावर्षी पुन्हा एकदा मोठ्या आनंदोउत्साहात पावसाची तमा न बाळगता मालवण बंदर जेटी येथे साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवलंका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले सिधुदुर्गवर किल्ल्यातील मानकऱ्यानी सागराला सुवर्णाचा मुलामा असलेले श्रीफळ अर्पण केल्याची तोफ डागली अन.. मालवणच्या किनाऱ्यावर सागरास श्रीफळ अर्पण करून सागरेश्वरा शांत हो अशी विनवणी व्यापारी बांधव व मच्छीमार बांधवांनी केली.

शिव काळात नारळी पौर्णिमेला पोवात्याची पौर्णिमा म्हणून ओळखले जायचे आजही किल्ले सिंधुदुर्गावर नारळी पौर्णिमेला पोवात्याची पौर्णिमा म्हणून संबोधले जाते. या पोवात्याच्या पौर्णिमे दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने किल्ले सिंधुदुर्गावर सोन्याचे श्रीफळ सागराला अर्पण करून त्याला तोफेची सलामी दिली जायची. हि शिवकालीन परंपरा आजही जपली जात आहे. मात्र आता सोनेरी मुलाम लावलेला श्रीफळ किल्लेवासीय तसेच मालवणवासीय सागराला अर्पण करतात.

दुपारी बाजारपेठेतील हनुमान मंदिरात व्यापारी संघाच्या वतीने श्रीफळ ठेऊन मालवणच्या भरभराटीसाठी साकडे घालण्यात आले. त्यानंतर व्यापारी संघाचा नारळ वाजत गाजत मिरवणुकीने हनुमान मंदिर ते बंदर जेटी येथे नेण्यात आला. त्या ठिकाणी विधिवत पूजा करून श्रीफळ सागराला अर्पण करण्यात आले. नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने नारळ लढवणे स्पर्धा व अन्य स्पर्धा या निमित्ताने आयोजित करण्यात आल्या होत्या. शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्यासह मान्यवरांनी यावेळी उपस्थिती दर्शवली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!