असरोंडी मधील बीएसएनएल टॉवर नादुरुस्त ; ग्रामपंचायतीने वेधले दूरसंचारचे लक्ष

तात्काळ बिघाड दूर करा ; उपसरपंच मकरंद राणे यांची मागणी

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील बीएसएनएलच्या टॉवरमध्ये बिघाड झाला असून पाच मिनिटांसाठी जरी वीज प्रवाह खंडित झाला तरी अर्धा ते एक मोबाईलला रेंज मिळत नाही. हा बिघाड तात्काळ दूर करावा, अशी मागणी असरोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच मकरंद राणे यांनी शुक्रवारी दूरसंचार अधिकाऱ्यांकडे केली आहे.

यावेळी माजी उपसभापती राजू परूळेकर हे देखील उपस्थित होते. असरोंडी गावामध्ये बीएसएनएल टॉवर असून सदर टॉवर लाईट गेल्यावर पूर्णपणे बंद होत आहे. त्यामुळे येथील मोबाईल ग्राहकांची गैरसोय होत आहे. तसेच शासकीय कामकाज करणेही अवघड होत आहे. तरी याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून टेलीफोन एक्सेंज किंवा बीएसएनएल टॉवर यांच्यात असणारा बिघाड तात्काळ दुरुस्त करून येथील ग्राहकांची गैरसोय दूर करावी व नादुरुस्त असलेला टॉवर कार्यान्वीत व्हावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मठबुद्रुक गावातील बीएसएनएल टॉवर शोभेचाच : राजू परुळेकर

पाच वर्षांपूर्वी मठबुद्रुक गावामध्ये खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते बीएसएनएलच्या टॉवरचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर दोन-अडीच वर्षांपूर्वी हा टॉवर उभा करण्यात आला आहे. मात्र हा टॉवर शोभेचाच बनला असून याठिकाणी अन्य कोणतीही यंत्रणा बसवलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना या टॉवरचा कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे हा टॉवर केवळ ठेकेदाराच्या कमिशन साठीच उभारण्यात आला होता का? असा सवाल माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी उपस्थित केला आहे. सदरील टॉवर लवकरात लवकर कार्यान्वित न केल्यास ग्रामस्थांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. परुळेकर यांनी यावेळी दिला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!