किनारपट्टीवरील बंधाराकम रस्त्यासाठी केंद्र स्तरावर आराखडा तयार करणार

तात्पुरती उपाययोजना म्हणून देवबाग गावच्या संरक्षक बंधाऱ्यासाठी १ कोटी देण्याची ना. राणेंची घोषणा

सात- आठ वर्षात विकास ठप्प होण्यास शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप

येथील आमदाराने दोन दिवस संरक्षण न घेता फिरून दाखवावे ; जनताच घेरल्याशिवाय राहणार नाही

कुणाल मांजरेकर

मालवण : देवबाग गाव विकासाच्या वाटेवर असताना गेल्या काही वर्षात येथील विकास ठप्प झाला आहे. येथील आमदार, खासदार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असून आपण मात्र येथील जनतेसोबत कायम आहोत आणि यापुढेही राहू. येथील बंधारा, रस्ते, वीज, पाणी या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील. बंधाऱ्यासासाठी सद्यस्थितीत तात्पुरती उपाययोजना म्हणून एक कोटींचा निधी देत असल्याची घोषणा केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांनी देवबाग गावच्या भेटीवेळी जाहीर केले. वायरी, तारकर्ली, देवबाग किनारपट्टीवर बंधाराकम रस्ता उभारण्यासाठी केंद्र स्तरावर आराखडा तयार केला जाईल असाही शब्द ना. राणे यांनी ग्रामस्थांना दिला.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्व स्तरातील जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी मालवण तालुक्याचा दौरा केला. कांदळगाव येथील श्री देव रामेश्वराचे दर्शन घेत सायंकाळी देवबाग येथे मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, पर्यटन महासंघ जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, नादार तुळसकर, तारकर्ली पर्यटन संस्थेचे रवींद्र खानविलकर, अध्यक्ष सहदेव साळगावकर, मंदार लुडबे, रामा चोपडेकर, जॅक्सन फर्नांडिस, नमिता गावकर, दाजी सावजी, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, मोहन कुबल, गणेश कुशे यासह भाजप पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी नादार तुळसकर यांनी देवबाग बंधारा प्रश्न मांडला. तर बाबा मोंडकर यांनी बंधारा कम रस्ता, मोरयाचा धोंडा पर्यटन विकास, मच्छिमार सुविधा, मच्छिमार महोत्सव आदी विषय मांडले. रवींद्र खानविलकर, सहदेव साळगावकर व अन्य ग्रामस्थ यांनी बंधारा, वीज, पाणी आदी समस्या मांडल्या.

यावेळी ना. राणे म्हणाले, केंद्र सरकार मध्ये काम करत असताना खूप समाधान मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच जनहीताचे प्रश्न जाणून घेतात, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देतात. केंद्रातील सरकार हे लोकहिताचे निर्णय घेणारे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार बांधव, पर्यटन व्यवसायिक यांच्या समस्या जाणून घेत त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक सोयीसुविधा उपल्बध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. माझे आणि तुमचे नाते भावनिक आहे. मतदार म्हणून नव्हे तर आपली माणसे म्हणून नाते जोडले आहे. आज केंद्रीय असतानाही या कोकणी जनतेचा मोठा पाठिंबा मला आहे. १९९० ला आमदार झालो. देवबाग ग्रामस्थ पहिल्यांदा निवेदन घेऊन भेटले. समुद्री अतिक्रमण मुळे स्थलांतर नोटिसा प्रशासनाने पाठवल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी त्यांना शब्द दिला स्थलांतर होऊ देणार नाही. आणि शब्द पूर्ण केला. बंधारा बांधला, देवबाग गावात रस्ताही झाला. पर्यटन वाढले. असेही मंत्री राणे म्हणाले.

राणेसाहेबांच्या माध्यमातून विकास ; उपस्थितांनी मांडली भूमिका

अनेक ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी विचार मांडताना राणे साहेबांच्या माध्यमातूनच देवबागचा खऱ्या अर्थाने विकास झाल्याचे सांगितले. बंधारा, रस्ते, वीज, पाणी हा विकास राणे साहेबांमुळेच शक्य झाल्याचे ग्रामस्थांनी सांगत त्यांचे आभार मानले. जिल्ह्यात हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, इंजिनिअर कॉलेज व अन्य शिक्षण संस्था उभारणी करून दर्जेदार शिक्षण उपलब्द करून देणे, वडिलांच्या नावे ट्रस्ट उभारून अनेकांना मदत देणाऱ्या नारायण राणे यांच्या कार्याचा गौरव यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, विजय केनवडेकर यांनीही विचार मांडले.

खोटे बोलून जनतेला फसवणे हीच शिवसेनेची भूमिका

गेल्या सात, आठ वर्षात येथील विकास ठप्प होण्यास शिवसेना जबाबदार आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यात व ते सोडवण्यात शिवसेनेचे आमदार, खासदार अपयशी ठरले. सी वर्ल्ड, विमानतळ यालाही शिवसेनेनेच विरोध केला. केवळ खोटे बोलून जनतेला फसवणे व धूप कापूर वाटून मते मिळवणे हेच प्रकार येथे सुरू आहेत. मात्र या लोकप्रतिनिधी यांचा खरा चेहरा जनतेला समजला आहे. त्यामुळे भविष्यातील निवडणुकीत जनता भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम राहील. भाजपच्या माध्यमातून येथील विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.

आमदाराने दोन दिवस संरक्षण न घेता फिरावे

नितेश राणे यांना राज्य सरकारचे विशेष संरक्षण नाहीच आहे. मात्र येथील आमदाराला राज्य सरकारचे संरक्षण आहे. असे असताना नितेश राणे यांना संरक्षण न घेता फिरा असे म्हणण्यापेक्षा येथील आमदाराने स्वता संरक्षण न घेता दोन दिवस फिरावे. समस्याग्रस्त जनताच आमदाराला घेरल्याशिवाय राहणार नाही, असा टोला मंत्री राणे यांनी लगावला.

राष्ट्रपती राजवट लागून जनतेला न्याय मिळाला पाहिजे..!
शून्य काम करणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला. राज्यातील सरकार जायलाच पाहिजे. आरोप झाले तरी आपल्या मंत्र्यांना वाचवणे व विरोधी पक्षातील नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे. हेच काम हे सरकार करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे अनेक जण राष्ट्रपती राजवटीची मागणीही करत आहेत. राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे अशी भूमिका पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे यांनी मांडली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!