प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढत असल्याचे चित्र


समस्या सुटलेल्या नागरिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन मानले आभार
सिंधुनगरी : पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या भेटीगाठी संवादात नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून आले. या संवादात ५० निवेदने प्राप्त झाली.यापूर्वी शंभर दीडशे निवेदने येत होती, यावेळी मात्र ती संख्या घटली असल्याचे दिसून आले. यावेळी विकास कामांशी संबंधित मागण्यांची निवेदने अधिक होती. एकूणच, या संवादातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या समस्या मागील संवाद कार्यक्रमात सुटल्या गेल्या अशा नागरिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आभार मानले.

पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या दालनात घेतलेल्या या संवाद कार्यक्रमांमध्ये नागरिक, शिक्षक, संस्थाचालक, कंत्राटी कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते. प्राप्त निवेदनांवर तत्काळ दखल घेत पालकमंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत अनेक प्रश्न मार्गी लावले. यावेळी शिक्षकांच्या संच मान्यतेचा विषय मंत्रालयातील बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निकाली काढला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शक्तीपीठ महामार्गाच्या प्रश्नावर नागरिकांना विश्वासात घेऊनच तो मार्गी लावला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
शिक्षकांच्या जुन्या पेन्शनच्या प्रश्नाबाबतही सकारात्मक भूमिका घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले. यासंदर्भातील निवेदनावरही निर्णय घेण्यात आला. याशिवाय काही अतिक्रमणांचे प्रश्न, तसेच विविध विकास कामांच्या मागण्यांबाबतची निवेदने स्वीकारण्यात आली. यावेळी सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया वालावलकर, सावी लोके, भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शिंदे शिवसेना अध्यक्ष दामू सावंत आधी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
















Subscribe to my channel




