खा. विनायक राऊत यांच्या मागणीची ना. गडकरींकडून दखल !
![](https://i0.wp.com/kokanmirror.com/wp-content/uploads/2021/12/FB_IMG_1640186432756.jpg?fit=1080%2C720&ssl=1)
कुणाल मांजरेकर
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही रखडले आहे. त्यामुळे वाहन चालकांची प्रचंड गैरसोय होत असून हा रस्ता अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्ण राहिलेल्या कामाची तातडीने पूर्तता होण्यासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मागणीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिल्लीत संबंधित विभाग आणि ठेकेदारांची बैठक घेतली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीमध्ये महामार्गाचे रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश ना. गडकरी यांनी दिले आहेत.
मुंबई -गोवा महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले असले तरी रत्नागिरी, रायगडमध्ये बरेच काम अपूर्ण आहे. त्यामुळे हा महामार्ग धोकादायक बनला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे याठिकाणी लक्ष वेधले होते. त्यानुसार बुधवारी ना. गडकरी यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासह आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन रस्त्यांच्या रखडलेल्या कामासंदर्भातअधिकारी व ठेकेदार यांची संयुक्त बैठक दिल्ली येथे आयोजित केली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश ना. नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती खा. विनायक राऊत यांनी दिली आहे.
![](https://i0.wp.com/kokanmirror.com/wp-content/uploads/2021/12/FB_IMG_1640186435816.jpg?resize=1024%2C683&ssl=1)