पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांची प्रतिक्रिया ; ‘खोटं बोला, पण रेटून बोला’ ही वैभव नाईकांची प्रवृत्ती
मालवण : आमदार निलेश राणे यांच्याच कारकिर्दीत मच्छिमारांच्या झोपाडयांना नोटीसा पाठवण्यात आल्या. पण मी आमदार असताना अशा प्रकारे कोणाही मच्छिमाराला नोटीसा आल्या नव्हत्या, असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला होता. या दाव्याचा मत्स्य व पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांनी समाचार घेतला आहे. तुम्हीच आमदार असताना दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने माझे बंदरजेटी वरील राहते घर कोर्टाचे मनाई आदेश असताना जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. त्यावेळी तत्कालीन आमदार वैभव नाईक यांनी चकार शब्दही का काढला नाही ? असा सवाल करून खोटे बोला, पण रेटून बोला ही वैभव नाईक यांची प्रवृत्ती मच्छिमार बांधवही चांगलीच ओळखून आहेत. त्यामुळेच किनारपट्टी वरून त्यांना कमी मते मिळाली, असे श्री. तोडणकर यांनी म्हटले आहे.
प्रशासनाकडून सातत्याने किनारपट्टी वरील मच्छिमारांच्या घरे व कावनाना नोटीसा दिल्या जातात. वैभव नाईक हे आमदार असताना देखील दरवर्षी अशा नोटीसा दिल्या जात. मात्र वैभव नाईक यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. माझ्या राहत्या घराला कोर्टाचे मनाई आदेश असतांना देखील दोन वर्षांपूर्वी जेसीबी लावून जमीन दोस्त करण्यात आले. त्यामुळे केवळ मच्छिमारांची दिशाभूल करण्यासाठीच वैभव नाईक खोटी वक्तव्ये करीत आहेत, असा आरोप दामोदर तोडणकर यांनी केला आहे.