सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांकडून चुकीच्या पध्दतीने कारवाई

पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष द्यावे ; बाबा मोंडकर यांची मागणी

कुणाल मांजरेकर

मालवण : जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई सुरू आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर होणार आहे. जिल्ह्यातील पोलीस विभाग पर्यटन व्यावसायिकांना सहकार्य करत असताना पोलीस विभागातीलच काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींना त्रास देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. याकडे पालकमंत्री उदय सामंत यांनी गांभीयाने लक्ष द्यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे गेले दोन वर्षें बंदस्थितीत असलेला पर्यटन व्यवसाय थोड्याफार प्रमाणात पूर्वपदावर येत आहे. हे होत असताना मागील थकीत बँक हप्ते व्याज, लाईटबील, पाणीबिल, शासकीय कर यामध्ये स्थानिक प्रशासन व राज्य सरकार कडून कुठलीही मदत स्थानिक पर्यटन व अन्य व्यावसायिकांना मिळालेली नाही. आजही पर्यटन व्यावसायिक या कर्जाच्या बोजातून बाहेर येण्यासाठी व्यावसायिक पातळीवर प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात गेल्याच आठवड्यात आंबोली येथील डार्क फॉरेस्ट हॉटेलवर पोलीस खात्यामार्फत कारवाई करण्यात आली. ऍग्रो कॉन्फरंस व पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर रेव्हपार्टी व विदेशी महिला असे दाखवून पोलीस केस दाखल करण्यात आली. पण वास्तविकता वेगळी होती. या ग्रुपमध्ये आलेल्या महिला या देशातील हैद्राबाद व तेलंगाणा या भागातील होत्या व त्याच भागातील सर्व पर्यटक होते. या सर्वांची आधारकार्ड आजही त्या हॉटेलकडे उपलब्ध आहेत. त्यावेळी ऍग्रो कॉन्फरंस संपून पर्यटक जेवण करत होते. त्यामुळे अशी कारवाई करणे चुकीचे आहे.

सध्या स्कूबा डायव्हिंगसाठी गोवा राज्यातून टेम्पो ट्रॅव्हलरच्या माध्यमातून मालवण मध्ये येणाऱ्या पर्यटकांना महामार्गावर अडवून हायवे पोलीसांकडून तासनतास चौकशी केली जाते. तसेच तपासणीच्या नावाखाली जिल्ह्यात पोलीस खात्याकडून पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तींना त्याच्या बॅग खोलणे व अन्य नाहक त्रास दिला जात आहे. या सर्व गोष्टीकडे पालकमंत्री उदय सामंत यांनी गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सदर विषयी चुकीच्या पद्धतीने चालवलेल्या कारवाया थांबविण्याच्या सूचना देण्यात द्याव्यात. अश्या पद्धतीने पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तींना त्रास दिल्यास त्याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर होणारा आहे, असे बाबा मोंडकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!