न्यायालयाचे मनाई आदेश धाब्यावर ; ग्रामस्थांनी वेधलेय तहसील कार्यालयाचे लक्ष


अवैध वाळू उत्खननामुळे बेटांची अतोनात झीज : कांदळवन नष्ट होण्याच्या मार्गावर
वाळूचोरांना अटकाव करण्यास जाणाऱ्या ग्रामस्थांना दमदाटी व जीवे मारण्याची धमकी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील कर्ली नदीपात्रात देवली पुलापासून ६०० मीटरच्या आत रेती गट ( डी ५) च्या बाजूला सायंकाळी ७ वाजल्यापासून सुमारे ५ ते १० बोटींच्या सहाय्याने अनधिकृत वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या पत्रानुसार कर्ली पुलापासून ६०० मीटरच्या आत होत असलेल्या अवैध वाळू उत्खननामुळे नदीपात्राची झीज होऊन पुलाच्या पात्रास आणि पुलास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुले आम सुरु असलेल्या या वाळू उपाशाकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने देवली वाघावणे येथील ग्रामस्थांनी या अवैध वाळू उपशाकडे मालवण तहसील कार्यालयाचे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे याठिकाणी वाळू उपसा करण्यास न्यायालयाची मनाई असताना देखील येथे राजरोजपणे वाळू उपसा सुरु आहे.
या अनधिकृत वाळू उपशाकडे देवली वाघवणे येथील ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे मालवण तहसीलदारांचे लक्ष वेधले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कर्ली पुलाच्या बाजूस आमची घरे, शेती, माडबागायती आहे. आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, देवली येथील पुलापासून ६०० मीटरच्या आत रेतीगट (डी-५) च्या बाजूला सायंकाळी ७.०० वाजल्यापासून पुढे अवैध वाळू उत्खनन सुरु आहे. सुमारे ५ ते १० बोटींच्या सहाय्याने हे अवैध वाळू उत्खनन सुरु असून कली पुलाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाला आहे.
वाळू उपसा करणाऱ्या भैया कामगारांना अटकाव करण्यास गेलो असता ग्रामस्थांना वाळू चोरांकडून धमक्या दिल्या जातात. दोन दिवसांपूर्वी मांडखोल चौके येथील एक ग्रामस्थ हे देवली-वाघवणे येथील खारबंधाऱ्यावरुन या अवैध वाळू उपसा करणाऱ्या भैया कामगारांना अटकाव करत असताना त्यांचे भाऊ यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार ग्रामस्थ व वाघवणे पोलीस पाटील यांच्या समक्ष घडला. याची कल्पना त्याचवेळी वाघवणे पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशन मालवण यांना दिलेली आहे.
या अवैध वाळू उत्खननामुळे खाडीतील बेटांची अतोनात झीज झालेली आहे. त्यामुळे या बेटांवरील कांदळवनाची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. एका बाजूला आपण कांदळवन संरक्षणासाठी कठोर कायदे करत आहात तर दुसऱ्या बाजूला आपल्या समोरच हे नियम, कायदे धाब्यावर बसवून कांदळवन नष्ट करत आहेत,
काही वर्षापूर्वी अवैध वाळू उत्खनन करणारे भैया कामगार व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संघर्षातून एका भैया कामगाराचा दुदैवी मृत्यु झाला होता.
रात्री अपरात्री या बोर्टीच्या कर्कश आवाजामुळे येथील अबाल वृद्धांची रात्रीची झोप नष्ट झाली आहे. रात्रभर सुरु असलेल्या या बोटींमुळे मुलांना रात्रीची झोप मिळत नाही त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे.
सद्यस्थितीत कली खाडीमध्ये वाळू उत्खनन करायला मा. न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. असे असताना हे अवैध वाळू उत्खनन सुरु आहे. येथे मा. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन मा. न्यायालयाचा अवमान करत आहेत. तरी या सर्व गंभीर बाबींचा गांभिर्याने विचार करुन देवली पुलानजीक सुरु असलेले अवैध वाळू उत्खनन कायमस्वरुपी बंद करुन या बोटींवर कठोर कारवाई करावी. यासाठी प्रशासनास ग्रामस्थांच्या सहकार्याची गरज भासल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
















Subscribe to my channel




