आम. निरंजन डावखरे विजयाची हॅट्ट्रिक साधणार ; शिंदे शिवसेनेचा मालवणात विश्वास 

ब्रिगे. सुधीर सावंत यांची वक्तव्ये त्यांची वैयक्तिक भूमिका ; त्यांचे विचार शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही : रत्नाकर जोशी

मालवण ( कुणाल मांजरेकर) कोकण पदवीधर मतदार संघांत मागील दोन टर्म नेतृत्व करणारे महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. महायुती मधील घटक पक्ष म्हणून शिवसेना व युवासेनेने गेले पंधरा दिवस त्यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात प्रचार यंत्रणा राबवली आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने ज्या प्रमाणे महायुतीचे उमेदवार खास. नारायण राणे यांना साथ दिली तशीच साथ निरंजन डावखरे यांना जनता देईल आणि विरोधी उमेदवार रमेश किर यांना बाजूला सारून आम. डावखरे यांना पहिल्या क्रमांकाची पसंती देईल. त्यामुळे आम. डावखरे हे विजयाची हॅट्ट्रिक साधतील, असा विश्वास शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. दरम्यान, माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत हे सध्या जी काही वक्तव्ये करीत आहेत, ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्यांचे विचार ही शिवसेना पक्षाची भूमिका नाही, त्यांच्या मतांशी पक्षाचे देणेघेणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मालवण येथील मिनी मालवण हॉटेलमध्ये शिवसेना पक्षाच्या जिल्हा युवासेनेची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी हे बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाध्यक्ष सौ. सोनाली पाटकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवतीसेना तालुकाप्रमुख गायत्री ढोलम, शहरप्रमुख प्रियांका मेस्त्री, युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, मेहुल धुमाळे, आदित्य राणे, दाजीबा कुबल, नितेश मेस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी रत्नाकर जोशी म्हणाले, कोकण पदवीधर मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार आम. निरंजन डावखरे यांना अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. डावखरे यांना पदवीधर आमदार म्हणून दोन टर्मचा अनुभव आहे. आम्ही गेले पंधरा दिवस प्रचार यंत्रणा राबवत असून डावखरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांच्या विजयाची शंभर टक्के खात्री आम्हाला आहे, असेही श्री. जोशी म्हणाले. 

कोकण पदवीधर मतदार संघात अडीच लाख पदवीधर मतदार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ हजार मतदार तर मालवण कुडाळ मतदार संघात १८०० मतदार आहेत. मालवण कुडाळसह जिल्ह्यात मतदारांची संख्या कमी आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत जनजागृती करूनही नवीन मतदार नोंदणीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, महिन्याभरापूर्वीच लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्याने याकडे आमचेही दुर्लक्ष झाले हे आम्ही मान्य करतो, मात्र यापुढे पदवीधर मतदार वाढविण्यासाठी प्रयत्न करू, असेही रत्नाकर जोशी यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3276

Leave a Reply

error: Content is protected !!