अक्कलकोट | आता श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान राहणार २० तास खुले…

दिवाळी सुट्टयांमधील गर्दीमुळे भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय ; गर्दीच्या कालावधीत भाविकांच्या वतीने स्वामींना होणारे अभिषेक बंद राहणार

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थाचे मुळस्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दिवाळी सुट्टयांमधील भाविकांच्या गर्दीमुळे २० तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदीर समितीने घेतला असल्याची माहिती समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली आहे.

या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी दिवाळी सुट्टयांचा कालावधी म्हणजे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीच्या विसंगतीतून संपूर्ण कुटूंब एकत्र येण्याचा काळ. हा काळ सत्कर्मी लागावा व भविष्यातील जीवन सदाचाराने जगता यावा यासाठी या दिवाळी सुट्टयांच्या काळात पुणे, मुंबई सारख्या महानगरासह देशभरातून अपार श्रध्देने स्वामी भक्त मोठ्या संख्येने स्वामी दर्शनाकरीता येथे येत असतात. येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थांचे दर्शन सुलभ रित्या घेता यावे, याकरीता दिवाळी सुट्टयांमधील भाविकांच्या गर्दीमुळे गुरूवार दि. १६ ऑक्टोबर पासून येत्या त्रिपुरारी पौर्णिमे पर्यंत या कालावधीत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाटे ३ ते रात्री ११ असे नियमीतपणे २० तास खुले राहणार आहे. दिवाळी सुट्टयांमधील गर्दीच्या कालावधीत श्री स्वामी समर्थांचे सामुहीक बॅच मधून अभिषेक होतील. स्वामी भक्तांची गर्दी वाढत राहील्यास भाविकांना सुलभ स्वामी दर्शन होणेसाठी गर्दीच्या कालावधीत भाविकांच्या वतीने स्वामींना होणारे अभिषेक प्रासंगिक बंद ठेवण्याचा निर्णय पुरोहीत व मंदीर समितीने राखून ठेवला आहे असे सांगून भाविकांच्या सोई सुविधांना अनुकूल अशा मंदीर समितीच्या नियोजनानुसार येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा लाभ घेवून मंदीर समितीस सहकार्य करावे असे आवाहन ही मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी या प्रसंगी भाविकांना केले आहे.

error: Content is protected !!