निलेशजी राणे यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा…

भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाळा गोसावी यांची मागणी

मालवण : भारतीय जनता पक्षाला सद्यस्थितीत निलेश राणे यांच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे. मालवण कुडाळ मतदार संघात निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बांधणी सुद्धा चांगल्या प्रकारे सुरु असून भावी आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत. त्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून संन्यास घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना बळ द्यावे, अशी मागणी भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी यांनी केली आहे.

भाजप नेते निलेश राणे हे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राजकारणातील जाहीर केलेली एक्झीट ही त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. आज कुडाळ मालवण मतदार संघात राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. यामध्ये निलेश राणे यांचा मोठा पाठपुरावा आहे. मतदारसंघात भाजपसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले असताना निलेश राणे यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे. निलेशजी राणे हे आपला निर्णय मागे घेतील आणि आम्ही कार्यकर्ते त्यांना तशी विनंतीही करणार असल्याचे बाळा गोसावी यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!