प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याना अर्ध्यावर सोडून निलेश राणे राजकीय एक्झिट घेऊ शकणार नाहीत…

निर्णय मागे घेण्यासाठी विनंती करणार ; भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची प्रतिक्रिया

राजकीय पेचप्रसंगावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण व निलेश राणे एकत्र बसून तोडगा काढण्याचा विश्वास

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपा नेते निलेश राणे यांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या निर्णया विरोधात भाजपात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याना अर्ध्यावर सोडून निलेश राणे राजकीय एक्झिट घेऊ शकणार नाहीत, आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांना आपला निर्णय मागे घेण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यात राजकारणा पलीकडे चांगली मैत्री आहे. त्यामुळे आता निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर ते एकत्र बसून योग्यतो तोडगा काढतील, असा विश्वास श्री. चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे.

निलेश राणे हे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांची राजकारणातील एक्झीट ही त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. पण निलेशजी राणे हे आपला निर्णय मागे घेतील आणि आम्ही कार्यकर्ते त्यांना तशी विनंतीही करणार असल्याचे श्री. चिंदरकर यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पार्टीत त्यांचा योग्य सन्मान करुन त्यांच्या मनातील इच्छा सुद्धा पुर्ण होतील. निलेशजी राणे आणि रविंद्रजी चव्हाण यांच्या समन्वयातून अनेक विकासकामे या तालुक्यात मार्गी लागलेली आहेत असे सांगून रविंद्र चव्हाण आणि निलेशजी राणे यांची राजकारणापलीकडील एक चांगली मैत्री आहे. त्यामुळे हे दोघे यावर लवकरच योग्य तोडगा काढून कार्यकर्त्याना आवडेल असा गोड निर्णय घेतील, असे श्री. चिंदरकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!