बाबी जोगी… जास्त फास्ट धावू नका, नाहीतर तोंडावर पडून दात घशात जातील !

दादा वाघ यांचा इशारा ; निवडणुकीत तिकिट मिळण्याच्या आशेने बाबी जोगी ठाकरे सेनेला लोचटासारखे चिकटून ; मात्र शिंदे गटाच्या भाईंशी “गुफ्तगू” सुरूच

मालवण | कुणाल मांजरेकर

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावरून भाजपचे माजी शहराध्यक्ष दादा वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांच्यातील आरोप – प्रत्यारोप सुरूच आहेत. दादा वाघ यांच्यासह सुदेश आचरेकर यांच्यावर बाबी जोगी यांनी केलेल्या टीकेला आता दादा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बाबी जोगी जास्त फास्ट धावू नका. नाहीतर तोंडावर पडून दात घशात जातील. पक्षात कोण नसल्याने योग्यता नसताना तुम्हाला शहरप्रमुखपद मिळाले. आगामी निवडणुकीत तुम्ही डबक्यातून गटारात फेकले जाणार. त्यामुळे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या नादी लागू नका. तेवढी तुमची पत नाही आणि कुवतही नाही. दैवज्ञ भवन येथील आमने सामने वेळच्या ‘रट्टे’ची आठवण मात्र आपल्याला असेलच. असा पलटवार दादा वाघ यांनी केला आहे. दरम्यान निढा असलेल्या बाबी जोगी यांना हे सर्व उमगणार का ? असा सवालही दादा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दादा वाघ यांनी म्हटले आहे की, बाबी जोगी आहेत त्या पक्षाचे वासे मोजत असतात. मात्र निवडणुकीत तिकीट मिळण्याच्या आशेने ते लोचटासारखा चिकटून आहेत. शिंदे गटाच्या भाईंशी त्यांचे गुफ्तगु सुरू असते. लाचारी व गद्दारी बाबी यांच्यात आहे. हे निमित्ताने स्पष्ट होते.

भाजप लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांचे व्हिजन आहे. मालवण शहराचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्याचा मानस आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण आदर्शवत शहर बनणार आहे. आमदार वैभव नाईक यांनी ९ वर्षात शहर तालुक्याला विकासाच्या बाबतीत मागे नेले. शहरात बंधारा व अन्य कोणतीही विकासकामे झाली नाहीत. त्यांचे अपयश समोर येत असल्याने पितळ उघडे पडलेल्या ठाकरे सेनेचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे नाहक टीकाटिप्पणी करण्याचे काम ठाकरे गट करत आहे. मात्र जनता सुज्ञ आहे. त्यांना सर्वकाही माहिती आहे. या बाबी जोगी सारख्या मंडळींना जनता जागा दाखवून देईल. यांची लोचट व दलाली परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलर मध्ये टाकून जनता समुद्रात बुडवेल. सेटलमेंट, चिरीमिरी वृत्तीला योग्य उत्तर दिले जाईल. असेही दादा वाघ यांनी सांगितले.

आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. मालवण शहरातील माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व सर्व भाजप पदाधिकारी स्वयंप्रकाशित आहेत. आचरेकर पाच वेळा नगराध्यक्ष राहिले आहेत. राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली शहरविकासाचा ध्यास त्यांनी ठेवला. जनतेशी नाळ जुळलेले व जनतेच्या सुखदुःखात सोबत करणारे नेतृत्व अशी सुदेश आचरेकर यांची ओळख आहे. २५ वर्षाच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी नगराध्यक्ष व विविध पदे भूषवून सिद्ध केले आहे. त्यामुळे आचरेकर यांची पत मोजण्याइतकी तुमची पत नाही. असा टोला दादा वाघ यांनी बाबी जोगी यांना लगावला.

अपक्ष नगराध्यक्ष निवडणूक लढवायला हिंमत व धमक लागते. ही धमक सुदेश आचरेकर यांच्यात आहे. बाबी तुझ्या सारख्या लफंग्याचे ते काम नाही. गद्दारी तुझ्या अंगात, रक्तात भिनली आहे. तर कुवत व समाजात पतही नाही. या गुणांनी तुझी योग्यता दिसून येते. त्यामुळे समाजाचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सांगण्याची गरज नाही. तुझे राजकारणातील वय, उंची व स्थान काय आहे याचा विचार करून लायकीत राहा. धगधगत्या आगीत हात घालण्याचा प्रयत्न केल्यास तर जळून राख व्हायला होते. हे माहितीच असेल असेही वाघ यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3527

Leave a Reply

error: Content is protected !!