बंदर विभागाचा अजब कारभार… कार्गो शिपिंग बोट बंदीच्या परिपत्रकाचा सरसकट नियम लावून जल पर्यटन केले बंद

पर्यटन जिल्ह्यासाठी स्वतंत्र जलपर्यटन परिपत्रकाची गरज ; पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची प्रतिक्रिया

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्या बरोबरच संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील जलपर्यटन २६ मे ३१ ऑगस्ट बंद ठेवण्याचा आदेश बंदर विभागाने दिल्याने संपूर्ण सागरी जलपर्यटन ऐन पर्यटन हंगामात बंद झाले आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकाना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. ज्या परिपत्रकाने ही जलपर्यटनाची बंदी घालण्यात येते, ते परिपत्रक शिंपीग कार्गो बोटींसाठी असून दरवर्षी त्याचा वापर करून संपूर्ण किनारपट्टी बंदी केली जाते. वास्तविक सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, जिल्ह्यात होणाऱ्या खाडी क्षेत्रातील जलक्रीडा तसेच समुद्र किनाऱ्यावर होणारी जलपर्यटन ७ ते ८ पेक्षा सागरी फॅदम क्षेत्रात होत असताना यासाठी स्वतंत्र जलपर्यटन परिपत्रक बनविणे गरजेचे आहे. दरवर्षी पर्यटन व्यावसायिकांच्या असंघटितपणाचा फायदा घेऊन बंदर विभाग बंदी आदेश काढून जलपर्यटन व्यवसायिकांवर अन्याय करत आहे .

सिंधुदुर्ग जिल्ह्या पर्यटन जिल्हा म्हणून राज्य व केंद्र सरकारने मान्यता देऊन २५ वर्ष पूर्ण होऊनही जिल्ह्यातील प्रशासकीय पद्धतीमध्ये पर्यटन क्षेत्रासाठी आवश्यक परिपत्रक न बनल्यामुळे त्याचा नाहक मनस्ताप जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांना होत असून राजकीय व प्रशासकीय मानसिकतेचा बळी स्थानिक पर्यटनावर होत आहे. पावसाळी हंगाम १० जून नंतर सुरु होत असून याचाही विचार प्रशासनाने करावा. हा विषय स्थानिक व वरिष्ठ मुख्य बंदर अधिकारी यांच्याशी बोलून सदर परिपत्रकात जल पर्यटनासाठी बदल व्हावा या साठी महासंघ प्रयत्शील आहे. मुख्य बंदर अधिकारी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद स्थानिक जल पर्यटन व्यावसायिकास मिळेल, असा विश्वास पर्यटन महासंघास आहे अशी माहिती विष्णू मोंडकर यांनी दिली आहे .

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3594

Leave a Reply

error: Content is protected !!