यश मिळवणं सोपं पण टिकवून ठेवणं कठीण ; कर्तबगारीने पदाची शान वाढवा !

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा भाजप सरपंचांना मुलमंत्र ; भाजपच्या सरपंचांचा पडवेत सत्कार

पडवे : सरकार कडून येणारा निधी टक्केवारीचे अर्थकारण न करता गावातील विकासासाठी व जनतेच्या कल्याणासाठी खर्च होणे आवश्यक आहे. यासाठी सरपंचाचे काम व कार्य महत्वाचे आहे. सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असतो याची जाणिव ठेवून जनसेवक म्हणून काम करा व पदाचा सन्मान ठेवून आणखी मोठे व्हा. यश मिळवण सोप असत पण ते टिकवण कठीण असत हे भान ठेवून कर्तबगारीने पदावी शान वाढवा, असा मुलमंत्र केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी पडवे येथील कुडाळ, मालवण नवनिर्वाचीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलतांना दिला.

या निवडणूकीत भाजपाच्या बाजूने सिंधुदुर्ग वासीयांनी जो कौल दिला, त्याबद्दलही ना. राणे यांनी जिल्हावासीय जनता व भाजप कार्यकर्त्यांचे कौतूक केले. ज्याप्रमाणे राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री असतो, तसाच गावाचा प्रमुख हा सरपंच असतो. सरपंचाने आपल्या गावामध्ये लोकांसाठी विविध योजना आणून आपला गाव विकसित केला पाहिजे. आपण लोकसेवक आहोत हे लक्षात ठेवून काम केले पाहिजे. कुठेही आपले नाव टक्केवारीमध्ये येऊ नये याची दक्षता सरपंच व सदस्यांनी घेतली पाहिजे. जगात कोणताही साबण भ्रष्टाचाराचे डाग घालवू शकत नाही, हे लक्षात ठेवून काम करा असे आवाहनही ना. राणे यांनी केले.

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कुडाळ व मालवण तालुक्यामध्ये भाजप प्रणित पॅनेलमधून सरपंच व सदस्य निवडून आल्यानंतर त्यांचा सत्कार पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल येथे करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, प्रदेश सदस्य दत्ता सामंत, अशोक सावंत, रणजीत देसाई, विजय केनवडेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला जे ग्रामपंचायत निवडणूक मध्ये यश आले आहे ते तुमचे आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे आहे. मी या ठिकाणी नसताना जे यश मिळाले त्यात मी समाधानी आहे. असे सांगून ज्याप्रमाणे राज्याचा मुख्यमंत्री प्रमुख असतो त्याप्रमाणे सरपंच हा गावाचा प्रमुख असतो त्याने गावातील लोकांच्या समस्या सोडवणे त्याचे काम असते लोकांसाठी विविध योजना राबवून गावाचा विकास करणे तसेच शासनाच्या योजना गावांमध्ये राबवून त्याचा लाभ जनतेला देणे हे सुद्धा सरपंचाचे काम आहे कोणत्याही प्रकारे टक्केवारी मध्ये आपले नाव येणार नाही आणि आपण बदनाम होणार नाही याकडे दक्षता घेतली पाहिजे. आपण लोकसेवक आहोत एकदा लागलेला भ्रष्टाचाराचा डाग पुसण्यासाठी कोणताही जगात साबण बनलेला नाही हे लक्षात घ्या. शासन स्तरावरच्या योजना गावापर्यंत राबवण्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला सहकार्य करू. फक्त त्याची अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. जे तुम्ही आता काम करणार त्या कामावर पुढील येणाऱ्या निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष काम करा असे आवाहन त्यांनी केले. कुडाळ तालुक्यातील २६ ग्रामपंचायत आणि मालवण तालुक्यातील ३२ ग्रामपंचायती भाजपकडे आल्या आहेत. मालवण तालुक्यातील २४० हून अधिक आणि कुडाळ तालुक्यातील २३५ जास्त सदस्यांचा सत्कार यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केले.

खासदार विनायक राऊत यांचा घेतला समाचार

सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा खासदार शोभत नाही. खासदार झाल्यापासून कोणते प्रकल्प आणले ते त्यांनी जाहीर करावेत. पाटबंधारे असो किंवा रोजगार निर्मितीचे प्रकल्प या जिल्ह्यात खासदार विनायक राऊत यांनी आणलेले नाहीत दोन लग्न करून स्वतःचा वैयक्तिक विकास केला असेल, पण त्याचा फायदा लोकांना काय? लोकांसाठी काय विकास कामे आणली ती त्यांनी सांगावीत. तसेच आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारे विकासात्मक कामे आणलेली नाही. शरीर मोठ असलं म्हणून चालत नाही सभागृहामध्ये बोलताना अभ्यास लागतो तो अभ्यास आमदार वैभव नाईक यांच्याकडे नाही असे त्यांनी सांगून फक्त राणे कुटुंबीयांवर टीका करायची एवढेच काम त्यांच्याजवळ आहे असे ना. राणे म्हणाले.

आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, दिशा सालियनवरआदित्य ठाकरे यांनी केलेले अत्याचार सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना जेल भोगावेच लागेल. आता सरकार आमचंच आहे असे त्यांनी सांगून कोणावरही टीका करून विकास होत नसतो तर काम आणि कर्तृत्वातून जायचं असे सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3527

Leave a Reply

error: Content is protected !!