कुडाळ, मालवण मतदार संघातील ८०% ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकणार

माजी खा. निलेश राणेंचा विश्वास ; आंबेरी येथे भाजपा पुरस्कृत उमेदवार कार्यकर्त्यांशी साधला साधला

मालवण | कुणाल मांजरेकर : आज केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपच्या सरपंचांनी विकास कामांची यादी माझ्याकडे दिली तर कोणत्याही विभागाकडून आपण ती मंजूर करून आणू शकतो. त्यामुळे विकासाची काळजी करू नका, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी आंबेरी (ता. मालवण) येथे भाजपा पुरस्कृत पॅनलचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले. ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात भाजपच नंबर वन राहणार असून कुडाळ, मालवण मतदार संघातील ८० % ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी आंबेरी गावाला भेट देत येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, अशोक तोडणकर, सरपंच पदाचे उमेदवार मनमोहन डिचोलकर, सचिन आंबेरकर, चंदन कांबळी, यशवंत आजगावकर, किशोर वाक्कर, समीर मांजरेकर, मोहन मेस्त्री, रवींद्र परब, कमलेश वाक्कर, श्रद्धा केळुसकर, गणेश डिचोलकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ आणि उमेदवार उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले, ग्रामपंचायत हे गावचे मंत्रालय असते. इथूनच कारभार चालत असतो. तुम्ही विकासकामांची चिंता करू नका. मोठ्या मताधिक्याने भाजपा पुरस्कृत उमेदवारांना निवडून द्या. जास्तीत जास्त निधी देण्याची जबाबदारी माझी आहे. आज केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे. अनेक लोकं भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सर्वात जास्त इच्छुक उमेदवार हे भाजपमध्ये आहेत. विरोधकांचा पक्षच शिल्लक राहिला नाही तर त्यांना उमेदवार कुठून मिळणार ? त्यामुळे तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून या. विकासाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात निधी देऊ. सर्व कामे करायची जबाबदारी आपली असल्याचे निलेश राणे म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!