
अभियंता दिन उत्साहात; बदलत्या तंत्रज्ञानासोबत कौशल्यविकास, संवादकौशल्य अन् नेतृत्वगुणांवर भर
सावंतवाडी : अभियांत्रिकी शिक्षणासोबतच उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा आणि भविष्यातील करिअरच्या संधींची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (वायबीआयटी) येथे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तांत्रिक ज्ञानासोबतच कौशल्यविकास, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती अंगीकारण्याचा कानमंत्र यावेळी विद्यार्थ्यांना मिळाला.
कार्यक्रमाला माणगाव येथील थर्मल इन्स्ट्रुमेंट्स इंडिया प्रा. लि.चे फॅक्टरी मॅनेजर विक्रम कोटणीस आणि महावितरण, सावंतवाडी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर भोसले नॉलेज सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, वायबीआयटीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि उपप्राचार्य गजानन भोसले उपस्थित होते. विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथी विक्रम कोटणीस आणि शैलेश राक्षे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे आणि यशाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
‘फक्त डिग्री नव्हे, कौशल्यही महत्त्वाचे’
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विक्रम कोटणीस यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान, उद्योगविश्वातील वाढत्या संधी आणि रोजगाराच्या बदलत्या गरजांवर प्रकाश टाकला. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ अभियांत्रिकीची पदवी पुरेशी नसून उद्योगक्षेत्राच्या अपेक्षांनुसार स्वतःमध्ये सातत्याने कौशल्यविकास करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. तांत्रिक ज्ञानासोबतच प्रभावी संवादकौशल्य, नेतृत्वगुण, टीमवर्क, व्यावसायिक शिस्त आणि सतत नवीन शिकण्याची तयारी या गुणांना उद्योगक्षेत्रात मोठे महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अभियंता दिनाच्या निमित्ताने आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर, नवकल्पना आणि संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान देण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. अभियंता दिनाचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ औपचारिक सोहळा न ठरता, अभियांत्रिकी शिक्षणातून उद्योगविश्वात यशस्वी वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारा मार्गदर्शनपर उपक्रम ठरला.






Subscribe to my channel






