मालवण शहरातील “बोगस” गटारे, व्हाळ्या साफसफाईचा निलेश राणे घेणार समाचार

११ जुलैला नगरपालिकेला देणार धडक ; भाजपा पदाधिकाऱ्यांची माहिती

वैभव नाईक यांनी केलेल्या सूचनांना मुख्याधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवल्याचा आरोप

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण नगरपालिकेमार्फत यावर्षी लाखो रुपये खर्चून करण्यात आलेली गटार आणि व्हाळ्यांची साफसफाई वादात सापडली आहे. यंदाच्या प्रत्येक पावसात शहरातील सर्वच रस्ते पाण्याखाली जात असून प्रशासकीय राजवट असलेल्या पालिकेच्या कारभारावर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील गटार खोदाई तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अन्य प्रश्नांबाबत प्रशासनाकडून उत्तरे घेण्यासाठी भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे सोमवारी ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मालवण नगरपालिकेला धडक देणार असल्याची माहिती प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मालवण शहरामध्ये पावसाचे पाणी साचून मालवण शहर जलमल होत आहे. नगरपालिकेचे ढिसाळ नियोजन, फक्त कामाचा दिखाऊपणा यामुळेच देऊळवाडा पूल, एसटी स्टँड, बाजारपेठ, मेढा या ठिकाणी सोमवारी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शहरात आपत्कालीन परिस्थिती असताना मुख्याधिकारी शहराच्या बाहेर होते. त्यांना फोन लावून विचारणा केली असता कामगार कपात आहे. ठेकेदार काम करत नाही असे उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकण्याचे काम वेळोवेळी मुख्याधिकारी करत आहेत. तक्रार करण्यासाठी दिलेला कर्मचाऱ्याचा फोन नंबर स्विच ऑफ, नगरपालिकेत प्रत्यक्ष प्रशासनाला विचारणा केली असता कोणतेही समाधानकारक व ठोस उत्तर कोणी देत नाही. असे असताना नालेसफाई व गटार सफाई करणाऱ्या ठेकेदाराचे बिल काढून प्रशासन मोकळे झाले आहे. कोणत्याही प्रकारच्या कामाची शहानिशा न करता काढलेली बिले ही टक्केवारीच्या संशयाच्या भौऱ्यातच आहेत.

पावसाळ्याच्या आधीच भाजपाने नालेसफाई व गटार सफाई संदर्भात नगरपालिकेचे लक्ष वेधले होते. त्यास अनुसरून आमदार वैभव नाईक यांनी आढावा बैठक घेऊन . मुख्याधिकाऱ्यांना लवकरात लवकर साफ सफाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र हे निर्देश मुख्याधिकाऱ्यांनी न पाळता त्याला केराची टोपली दाखवली आहे. यावरूनच आमदारांचा प्रशासनावर असणारा वचक दिसून आली आहे.

आधी सत्ताधारी असणारे व आता विरोधात असणारे लोकप्रतिनिधी मुख्याधिकाऱ्यांची बाजू घेऊन मुख्याधिकारीच कार्यसम्राट आहेत याची जनतेला प्रचिती देत होते. मुख्याधिकाऱ्यांवर कोणतीही टीका केली तरी शिवसेनेचे माजी नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांची कायम तळी उचलून धरत होते. हेच तळी उचलणारे लोकप्रतिनिधी पाणी साठल्याबरोबर मुख्याधिकारी कसे कामचुकार आहेत, हे दाखवण्यासाठी फोटोसेशन करताना दिसत आहेत, असे श्री. केनवडेकर यांनी म्हटले आहे.

भाजपा जनतेसमोर स्पष्टता मांडत असताना जनतेचे विषय घेऊन भांडत असताना भाजपकडून विकासाला खीळ घातला जातो, अशी टीका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कायम केली जात होती. आता हेच माजी लोकप्रतिनिधी मुख्याधिकाऱ्यांवर टीका करून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम करीत असून नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण कसे स्वच्छ आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करताना ते दिसत आहेत, असे भाजपने म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3606

Leave a Reply

error: Content is protected !!