रत्नागिरीत कोविड निर्बंधात सवलत दिली तरी नियमांचे पालन आवश्यक : पालकमंत्री ॲड. अनिल परब

रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्हयात कोविड स्थितीत सुधारणा झाली असल्याने राज्याप्रमाणेच जिल्हयात निर्बधात सवलत दिली जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी दिली. १५ ऑगस्टचे मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. निर्बंधात सवलत दिली असली तरी नागरिकांनी कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करायचे आहे याची जाणीव सर्वांनी ठेवावी, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री परब यांनी ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत विविध विषयांची माहिती घेतली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने तसेच जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थित होते. यातील लोकप्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीने सहभागी झाले होते. चिपळूण व खेड मधील अतिवृष्टी आणि त्यापूर्वी तौक्ते व निसर्ग चक्रीवादळात जिल्हा परिषद शाळंचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून शाळा सुरु करण्याचा निर्णय झाल्यास अडचण निर्माण होईल असे जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले. जिल्हयातील मोठया उद्योगांनी आपल्या सीएसआर फंडातून जि. प. शाळा उभारण्याची जबाबदारी घ्यावी असे आमदार भास्कर जाधव यांनी सुचविले. याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले.
चिपळूण आणि खेड मधील नुकसानग्रस्त दुकानांच्या गुमास्ता परवान्यासह इतर आवश्यक कागदपत्रांबाबतीत देखील या बैठकीत चर्चा झाली.
यावेळी कोविड संदर्भातील आढावा घेण्यात आला. केंद्राकडून जे व्हेंटीलेटर प्राप्त झाले त्यांतील निम्म्याहून अधिक बंद असल्याची तक्रार आहे, असे खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर आमदारांनी सांगितले. याबाबत प्रत्यक्ष त्या ठिकाणी वस्तुस्थिती काय आहे याची तपासणी करुन जिल्हा शल्य चिकित्सकांनी अहवाल सादर करावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध साधने व त्यातील तूट याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. जिल्हयात ऑक्सीजन बेडस् ची संख्या वाढविण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिली. यावेळी लसीकरण स्थिती आणि आगामी काळाचे नियोजन यावरही यावेळी चर्चा झाली.

Leave a Reply

error: Content is protected !!