माणगाव येथील शिवसेनेच्या महिला रणरागिणींचे शक्तीप्रदर्शन !

महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद : आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

कुडाळ : शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या माणगाव येथील महिला मेळाव्याचा शुभारंभ मंगळवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. माणगाव खोऱ्यातील महिलांच्या या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी घरापुरतं मर्यादित न राहता नेतृत्व करण्याची संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्वसामान्य महिलांना नेतृत्व करण्याची संधी शिवसेनाच देते. आपला समाज घडवायचा असेल तर महिलांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम केले पाहिजे. समाज घडला तरच आपण घडणार या भूमिकेतून काम केले पाहिजे. यासाठी शिवसेना नेहमीच महिलांच्या पाठीशी राहील असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी याप्रसंगी केले.

यावेळी महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, खासदार विनायक राऊत यांची कन्या रुची राऊत, कुडाळ महिला तालुकाप्रमुख मथुरा राऊळ, स्नेहा दळवी, प. स. सदस्या श्रेया परब, शरयू घाडी, विभागप्रमुख अजित करमलकर, विभाग संघटक कौशल जोशी, उपविभाग प्रमुख बापू बागवे, माजी जि. प. सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, महिला विभाग प्रमुख मनीषा भोसले, हुमरस सरपंच अनुप नाईक, वैभव परब, शैलेश विर्नोडकर, राजू ताम्हाणेकर, दीपक नानचे, बच्चू नाईक, गुरुनाथ माणगावकर, महेश जामदार, सूर्या घाडी, ज्ञानदेव कुडतरकर, साई नार्वेकर, बंड्या कुडतरकर, बंटी भिसे, समीर वजराटकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. लता मंगेशकर, कै. रमेश देव, कै. सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मेळाव्यामध्ये महिलांसाठी पैठणी स्पर्धा घेण्यात आली. तसेच हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला.

आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर व माझ्या पाठपुराव्यातून कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले महिला हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी महत्वाचे असलेले शासकीय मेडिकल कॉलेज होत आहे. शेतीच्या दृष्टीने भाताला चांगला दर मिळवून देण्यात आला. चांदा ते बांदा योजनेतून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना शेती अवजारे देण्यात आली. आता देखील सिंधुरत्न योजनेतून तशाच प्रकारचे लाभ समाज घटकांना देण्यात येणार असल्याची ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली.

जान्हवी सावंत म्हणाल्या, कोरोनाच्या कालावधीत शिवसेनाच नागरिकांच्या पाठीशी राहिली. समाजघटकांना वेगवेगळ्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. महिलांनी देखील आता आर्थिक सक्षम झाले पाहिजे. त्यावर शिवसेना महिला आघाडी भर देणार आहे. तसेच रोजच्या दगदगीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे, असे जान्हवी सावंत यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!