न्यायालयाच्या निर्णयानंतरही ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आ. नितेश राणेंचा “फॉर्म्युला” !
![](https://i0.wp.com/kokanmirror.com/wp-content/uploads/2021/12/FB_IMG_1639759450450.jpg?fit=1080%2C1626&ssl=1)
वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीत “त्या” चार जागांवर करणार आगळा वेगळा प्रयोग
कुणाल मांजरेकर
वैभववाडी : वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीसाठी यापूर्वी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झालेल्या जागांवर आमदार नितेश राणे यांनी आगळावेगळा फॉर्म्युला राबवण्याची घोषणा केली आहे. ज्या चार जागा ओबीसीसाठी आरक्षित झाल्या होत्या. त्या आता राज्य शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे रद्द झाल्या. त्या जागांवरील निवडणूक आता खुल्या वर्गातून होणार आहे. असे असले तरी त्या चारही जागावर भाजपा ओबीसी उमेदवार देणार आहे. भाजपाची ही भूमिका स्पष्ट आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
वैभववाडी भाजपा कार्यालयात माजी आ. प्रमोद जठार व आमदार नितेश राणे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आ. नितेश राणे बोलत होते. मागील पाच वर्षात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. विश्वासाने ज्यांना निवडून दिले त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली. या निवडणुकीत मात्र उमेदवारांची निवड अचूक करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील काळात परत परत चुका होणार नाही. याची काळजी आम्ही घेतली आहे. आणि जर चुका झाल्याच तर त्याला मी जबाबदार असेन असे नितेश राणे यांनी सांगितले. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे शहरातील एकाच प्रभागापुरते मर्यादित आहेत. त्या एकाच प्रभागात ते प्रचार करत आहेत. त्यांनी अशा पद्धतीचे पक्षात राजकारण करू नये. न.पं. मधील इतर १६ प्रभागावर त्यांनी अन्याय करू नये, अशी उपहासात्मक टिका आमदार नितेश राणे यांनी केली. पालकमंत्र्यांना करुळ व भुईबावडा घाट मार्ग पाहणी करण्यास वेळ मिळत नाही. परंतु नगरसेवक फोडण्यास त्यांना वेळ मिळतो अशी टीकाही आमदार नितेश राणे यांनी केली.