राणेंवर टीका करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी वेळ द्या ; जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांचा बट्ट्याबोळ !

भाजप नेते निलेश राणेंचा घणाघात : पणदूर येथील तलाठी कार्यालयाचे उद्घाटन

जिल्ह्याचा विकास करण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही; विकासासाठी निधी आणण्याची क्षमता भाजपातच

कुणाल मांजरेकर

कुडाळ : जिल्ह्यात सत्तेतील पालकमंत्री, आमदार, खासदार आहेत. पण जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचा काडीमात्र उपयोग झालेला नाही. जिल्ह्यात आवश्यक त्या प्रमाणात निधी येत नाही. जिल्ह्यात असा एक गाव नाही, ज्या गावांत एक किलोमीटर मागे रस्त्यावर खड्डा नाही. आज सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची साधी चर्चाही नाही. सत्तेतील लोकप्रतिनिधींचा एकही दिवस राणेंवर टीका केल्याशिवाय जात नाही. त्यामुळे राणेंवर टीका करण्यापेक्षा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी वेळ घालवा, असा सल्ला भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

पणदूर येथील तलाठी कार्यालयाचे उदघाटन शुक्रवारी निलेश राणेंच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्याचा विकास करण्याची धमक सत्तेतील कोणत्याही लोकप्रतिनिधीत नाही, जिल्ह्याच्या विकासासाठी निधी फक्त भाजपच्याच माध्यमातून येऊ शकतो, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला पणदूर सरपंच दादा साईल, उपसरपंच शिवराम पणदुरकर, भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, माजी सभापती मोहन सावंत, सभापती नूतन आईर, भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, युवा नेते विशाल परब, युवा मोर्चाचे रूपेश कानडे, रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर, बांव सरपंच नागेश परब, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, साक्षी सावंत, जिल्हा महिला सरचिटणीस रेखा काणेकर, बूथ कमिटी अध्यक्ष दीपक साईल, चंद्रकांत साईल, पोलीस पाटील देवू सावंत, माजी सरपंच शामसुंदर सावंत, महादेव सावंत, ग्रामसेविका सपना मसगे आदी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

निलेश राणेंकडून सरपंच दादा साईल यांचे कौतुक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्तेतील पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी विकासासाठी निधी आणलेला दिसत नाही, आणि ते आणू शकत नाहीत, ही या जिल्ह्याची शोकांतिका आहे. विकासाचे व्हिजन गावच्या सरपंचाकडे असणे गरजेचे आहे, ते व्हिजन पणदूर सरपंच दादा साईल यांच्याजवळ आहे, हे अभिमानास्पद आहे. त्यांचे कामच निधी खेचून आणील. पणदूर सरपंच दादा साईल यांनी ज्या पद्धतीत आपल्या गावच्या विकासाचे व्हिजन पाहिले आहे आणि त्या दृष्टीने ते विकासासाठी प्रयत्न करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचे व्हिजन प्रत्येक गावातील सरपंचाने पाहणे गरजेचे आहे. आपण आदर्श सरपंच पोपटराव पवार यांचे उदाहरण देतो, पण या ठिकाणी सुद्धा दादा साईल सारखे सरपंच आहेत, जे गावाच्या विकासासाठी झटत आहेत. आज जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या इमारतीची अवस्था खराब आहे, तिथे जावेसे सुद्धा वाटत नाही. पण पणदूर गावाच्या ग्रामपंचायतीची इतकी सुंदर इमारत असताना त्यातही आणखी चांगल्या सुविधांचे स्वप्न दादा साईल पाहत आहेत, ही कौतुकाची बाब आहे. आपल्या गावात तलाठी कार्यालय आणणे ही सोपी गोष्ट नाही, ती साईल यांनी करून दाखवली, याबद्दल निलेश राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

नुसत्या घरपट्टी आणि पाणीपट्टीवर ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्या बरोबर पर्यटना सारख्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास होऊ शकतो. त्यासंदर्भात लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन निलेश राणे यांनी दिले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!