हिंमत असेल तर नारायण राणेंनी वैभव नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवावी

खा. विनायक राऊत यांचं खुलं आव्हान ; विकास कामांचा धडाका पचनी पडत नसल्यानेच राणे पितापुत्र बेचैन

घावनळे मध्ये धडाडल्या शिवसेनेच्या तोफा ; पालकमंत्र्यांसह आ. वैभव नाईकांचीही तुफान टोलेबाजी

कुडाळ : नरेंद्र मोदी, अमित शहा यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांवर नारायण राणे व त्यांचे पुत्र उठसुठ आरोप करत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून सुरु असलेला विकासाचा झंझावात त्यांच्या पचनी पडत नसल्याची टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. देशात भाजपचे पंतप्रधान, गृहमंत्री असले तरी त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला देखील आम्ही तुरुंगात घालू शकतो हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाला दाखवून दिले आहे. सिंधुदुर्गात आज जुनी भाजप कुठेच नसून राणे भाजप म्हणून नावारूपास आली आहे. मात्र सिंधुदुर्ग वासियांनी नारायण राणेंना एकदा व त्यांच्या मुलाला दोनदा निवडणुकीत आपटलं आहे. हिंमत असेल तर नारायण राणेंनी आ. वैभव नाईक यांच्या विरोधात पुन्हा विधानसभा निवडणूक लढवावी, पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणेंना आणखी एकदा पराभवाची धूळ चाखू, असा इशाराही खासदार राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना कुडाळ तालुक्याचा मेळावा खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना. उदय सामंत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सायंकाळी घावनळे बामणादेवी येथे संपन्न झाला. याप्रसंगी घावनळे शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

मेडिकल कॉलेजच्या मान्यतेत काही मांजरे आडवी

यावेळी पालकमंत्री ना.उदय सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानतळ सुरू झाले आहे. १०० कोटी खर्चून दोडामार्ग येथे औषधी वनस्पती संशोधन प्रकल्प साकारला जाणार आहे. मेडिकल कॉलेजसाठी ९९६ कोटी मंजूर झालेत. एवढेच नव्हे तर आपल्या मेडिकल कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चर हे महाराष्ट्रातील पहिल्या दोन तीन क्रमांकावर आहे. परंतु मेडिकल कॉलेजला मान्यता मिळविताना अनेक मांजरे आडवी येतात, त्यावर आम्ही नक्कीच मात करू. जे कोणी अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत, ते शिवसेनेला अडचणी आणत नाहीत तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुले आहेत. ज्यांना डॉक्टर होण्याची इच्छा आहे त्यांच्या भवितव्याशी ही मंडळी खेळत आहेत. त्यांनी कितीही अडचणी आणल्या तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मेडिकल कॉलेज पूर्ण करून दाखवणारच, असे ते म्हणाले. येणाऱ्या निवडणुका जिंकणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी आतापासूनच सर्वांनी कामाला लागले पाहिजे. मेहनत घेतली पाहीजे. कुडाळ मध्ये प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आ. वैभव नाईक जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघात खेचून आणत असून विकास कामांसाठी जेवढा निधी आवश्यक आहे, तेवढा पुरविला जाईल, असे ना. उदय सामंत यांनी सांगितले.

काही लोकांचा विकास कामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न

आमदार वैभव नाईक म्हणाले, खा.विनायक राऊत, ना. उदय सामंत व आपल्या पाठपुराव्यातून अनेक विकासकामे कुडाळमध्ये होत आहेत. काही लोक त्यामध्ये अडथळा आणत आहेत. परंतु त्यांचा विरोध झुगारून लोकहिताची कामे मार्गी लावणार आहोत. जिल्ह्यात कोविड रुग्णांसाठी चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे हजारोंच्या संख्येने नागरिक कोरोना मुक्त झाले. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यासाठी एकाच वेळी ३८ रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आम्हा सर्वांच्या प्रयत्नांतून विमानतळ, महिला बाल रुग्णालय, शासकीय मेडिकल कॉलेज, औषधी वनस्पती संशोधन केंद्र हे मोठे प्रकल्प जिल्हात आणता आलेत. शिवसेनाच जिल्ह्याचा विकास करू शकते हे नागरिकांना देखील माहीत झाले आहे. कुडाळची जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकित कुडाळ तालुक्यातुन शिवसेनेला घवघवीत यश मिळवून देऊन उद्धव ठाकरे यांचे हात आपण बळकट करूया, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, अमरसेन सावंत, बबन शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, जि. प. सदस्य अनुप्रीती खोचरे, राजू कविटकर, उपसभापती जयभारत पालव, पं. स. सदस्य श्रेया परब, मथुरा राऊळ, तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, विभागप्रमुख रामभाऊ धुरी, उपविभागप्रमुख पप्पू म्हाडेश्वर, अँड. सुधीर राऊळ, रमा ताम्हाणेकर,विकास कुडाळकर, अतुल बंगे, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, सचिन कदम, सुनील सावंत, शेखर गावडे, बाळा कोरगावकर, अनुप नाईक, दीपक आंगणे, अवधूत मालवणकर, सचिन काळप, रुपेश पावसकर, प्रभाकर वारंग, अजित करमलकर, कौशल जोशी, अनिल खोचरे, अजित परब, आत्माराम सावंत, सागर म्हाडगूत, प्रशांत म्हाडगूत, दिनेश गोरे, यशवंत कदम, तुषार परब, बाबी भिंगारे, संतोष नागवेकर, आनंद परब, दीपक सावंत, राम तावडे, दादा मेस्त्री, शिवानी ठाकूर, राम कोकरे आदींसह पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रा.प. सदस्य, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!