मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकासमंत्री नितेश राणेंमार्फत मच्छिमारांच्या हिताचे अनेक निर्णय ; यापुढेही त्यांच्या माध्यमातून दांडी भागाचा विकास करणार : सौ. आचरेकर


मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक रणसंग्रामातील प्रभाग ९ ब च्या भाजपा उमेदवार सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांनी गुरुवारी दांडेश्वर मंदिरात श्रीफळ ठेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे मच्छिमारांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. यापुढेही त्यांच्या माध्यमातून दांडी भागाचा विकास करणार असल्याचे सौ. आचरेकर यांनी सांगितले.

दांडी येथील दांडेश्वर मंदिर येथे आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत, नगरसेवक पदाचे उमेदवार सन्मेष परब, यतीन खोत, मंदार केणी, दाजी सावजी, अजित आचरेकर, तोडणकर यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सौ. आचरेकर म्हणाल्या, दांडी येथील मच्छिमार, पर्यटन व्यवसायिक यांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. मत्स्य व बंदरे विकास मंत्री हे खातं पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आहे. येथील तरुणांना इथेच कसा रोजगार मिळेल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. बंधाराकम रस्ता सुद्धा होणार आहे. दांडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्याचा बचत गटांना फायदा होण्यासाठी खाऊ गल्ली सारखी संकल्पना मंत्री नितेश राणे यांच्याकडे आहे. किनाऱ्यावर बचत गट महिलांना स्टॉल लावून रोजगार उपलब्ध होणार आहे. मच्छिमारांच्या हितासाठी अनेक निर्णय नितेश राणे यांनी घेतले आहेत. मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. नेहमीच ते मच्छिमारांच्या पाठीशी राहिले आहेत. केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपाचे आहेत. खासदार नारायण राणे यांनीही दांडीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे जनतेने भाजपाच्या पाठीशी आहोत हे मतपेटीतून दाखवून द्यावे असे आवाहन प्रभाग क्रमांक ९ ब च्या भाजपा उमेदवार अन्वेषा आचरेकर यांनी केले आहे.

Subscribe to my channel




