मालवण : शहरातील देऊळवाडा परिसरात महावितरण कार्यालयाच्या मागील शेतात विद्युत वाहिनी तुटून पडल्याने उदय वालावलकर यांच्या म्हशीला विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतकरी उदय वालावलकर सुदैवाने बचावले.
या ठिकाणी यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. श्री. करलकर यांच्या म्हशीसह काही पाळीव कुत्र्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील जीर्ण वीजवाहिन्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
देऊळवाडा परिसरातील जीर्ण व धोकादायक वीजवाहिन्या तातडीने बदलण्यात याव्यात, तसेच विजेच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या म्हशीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्याला योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.