नारायण राणे यांची खासदारकी रद्द करा ; विनायक राऊतांची निवडणूक आयोगाकडे मागणी

पाच वर्षांसाठी मतदान व निवडणुक लढवण्यास बंदी घालण्याचीही मागणी ; ऍड. असीम सरोदे यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पत्र

मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून निवडून आलेले माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खासदारकी रद्द करून पुढील पाच वर्षे त्यांना निवडणूक लढवण्यास आणि मतदान करण्यास बंदी घालावी, अशी मागणी ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी ऍड. असीम सरोदे यांच्या मार्फत एका लेखी पत्रा द्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. नारायण राणे यांनी आदर्श आचारसंहीतेचा भंग केला आहे व मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत पैशांचे वाटप करून मतदारांना भुलवले आहे. त्याचप्रमाणे निधी न देण्याच्या धमक्या देऊन अनेकांना मतदान करण्यास धमकवले होते असे आरोप या पत्रात करण्यात आले आहेत.

स्वायत्त म्हणवून घेणारे निवडणुक आयोग सदर गंभीर आरोपांची दाखल किती तत्परतेने घेते यावर त्यांच्या स्वायत्तेची व्याख्या करता येईल. वारंवार होणाऱ्या असल्या आरोपांमुळे एकूणच निवडणुक आयोग व सत्ताधारी भाजप यांच्या कारभाराबाबत सामान्य लोकांच्या मनात शंका आहेत व त्यामुळेच जनता प्रत्येक निवडणुकीकडे संशयाने बघते. आता निवडणुक आयोगाला हा संशय जर खरेच दुर करायचा असेल आणी भाजपला आपण किती पारदर्शक आहोत व निवडणुक आयोगाच्या कार्यात हस्तक्षेप करत नाही हे जर सिद्ध करायचे असेल तर “नारायण राणे” प्रकरण त्यांना गांभीर्याने हाताळून दोषींवर कडक कार्यवाही करणे गरजेचे आहे, असे माजी खा. राऊत यांनी म्हटले आहे. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!