आ. वैभव नाईकांची राज्यात जाईंट किलर म्हणून ओळख ; टिकाकारांनी त्यांची काळजी करू नये

ठाकरे गट शहरप्रमुख बाबी जोगी यांचा सल्ला ; धनाशक्तीचा प्रचंड वापर होऊनही महायुतीला केवळ १२५७ चे मताधिक्य हेच शिवसैनिकांच्या कामाचे फलित

मालवण | कुणाल मांजरेकर

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात मताधिक्य कमी झाल्याने विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. पण वैभव नाईक हे जाईंट किलर म्हणून राज्यात ओळखले जातात. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा मुसंडी मारणारच आहेत. त्यामुळे टिकाकारांनी त्यांच्या राजकीय भवितव्याची काळजी करू नये. त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक समर्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर झाला. असे असताना देखील शहरातून त्यांच्या उमेदवाराला केवळ १२५७ चे मताधिक्य मिळाले आहे. हीच निष्ठावंत शिवसैनिकांच्या कामाची पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे मालवण शहरप्रमुख बाबी जोगी यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बाबी जोगी यांनी म्हटले आहे की, देशाचे नेतृत्व करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना मोठ्या प्रमाणात धनशक्ती वापरून.देखील शहरात  अत्यल्प मताधिक्य मिळालं. त्यामुळे शिवसैनिकांनी या पराजयाने खचून जाऊ नये. प्रतिकूल परिस्थितीत देखील निवडणुकीत विजय कसा खेचून आणायचा आणि आणतात हा शिवसैनिकांचा इतिहास आहे, हे ध्यानात घेऊन हेच शिवसैनिक आमदार वैभव नाईक यांना कुडाळ मालवण मधून निवडून आणतील आणि महाराष्ट्रात मंत्री बनवतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मालवण कुडाळ मधील जनतेला देखील आमदार वैभव नाईक यांना मंत्री झालेले पाहायचे आहे. त्यामुळे या एका पराजयाने आमदारांवरती टीका करणाऱ्यांनी आमदारांचा इतिहास पहावा. आमदार वैभव नाईक यांची राज्यात जॉईंट किलर म्हणून ओळख आहे, ती त्यांची ओळख शिवसैनिक, मतदार जनता तशीच कायम ठेवतील आणि त्यांना मंत्रीपदावर विराजमान करतील, असा विश्वास बाबी जोगी यांनी व्यक्त केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3276

Leave a Reply

error: Content is protected !!