राणेसाहेबांच्या विचारातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा पारदर्शक कारभार !

माजी खासदार निलेश राणे यांचे प्रतिपादन ; मसुरे शाखेचे नवीन जागेत स्थलांतरण 

अध्यक्ष मनिष दळवी यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक ; बँकेमार्फत अनेक नाविन्यपूर्ण योजना

मालवण | कुणाल मांजरेकर

जिल्हा बँक ही ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नाव राज्यभर अभिमानाने घेतले जाते. राणेसाहेबांच्या विचारातून ही बँक पारदर्शक कारभार करत असून पुढील २५ वर्षे राणेसाहेबांच्या विचारातुन ही बँक चालावी. या बँकेचा सर्वात जास्त फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे. आज जिल्हा बँकेच्या वतीने नवनवीन योजना कार्यान्वित करण्यात आल्या असून यासाठी अध्यक्ष मनिष दळवी यांचे मी अभिनंदन करतो. यापूर्वीचे अध्यक्ष अडचणी सांगायचे पण मनिष दळवी अडचणीतून मार्ग काढतात असे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी मसुरे येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखेचे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते नवीन जागेत स्थलांतरण झाले. या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँक अध्यक्ष मनिष दळवी, संचालक मेघनाद धुरी, बाबा परब, उद्योजक डॉ दीपक परब, अशोक सावंत, सौ सरोज परब, सरपंच संदीप हडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी माजी खास. निलेश राणे म्हणाले, कोकण बँकिंग क्षेत्रात खुप मागे आहे. सगळ्यांनी येथील बँकेत ठेवी वाढाव्यात यासाठी योगदान ध्यावे.   बँक टिकवणे मोठे काम आहे. या भागातील जनतेने आपण काही शाखेला देणे लागतो या भावनेने  काम करावे असे आवाहन केले.

बँक अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले,  या तालुक्यातील दुसरी शाखा या वर्षी स्थलांतर होत आहे. रस्त्या लगत सुसज्ज जागा उपलब्ध झाल्याने स्थलांतर होत आहे. निलेश राणे यांनी याबाबत नवीन जागेत स्थलांतर करण्याबाबत  प्रस्ताव ठेवला होता. व्यवसाय कमी असून देखील या भागातील शेतकरी व व्यवसाईक यांच्या साथीने येत्या  वर्षात ४० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करू शकू. वर्षभरात अनेक योजना जिल्हा बँकेने सर्वांसाठी आणल्या आहेत. डिजिटल बँकिंग योजने सह इंटरनेट बँकिंग चालू करणारी देशातील पहिली सहकारी बँक ठरणार आहे. डिपॉझिट प्रति महिना ५० कोटी येत आहे. ठेवी येण्या बरोबरच अनेक नवीन ग्राहक जोडले जात आहेत.शेतकऱ्यांच्या घरा पर्यंत जात सुविधा देत आहोत. येत्या मार्च पर्यंत सहा हजार कोटी व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

उद्योजक डॉ दीपक परब म्हणाले, ३४ वर्षांनी बँक नवीन जागेत येत आहे. जिल्हा बँक पाच हजार कोटी पेक्षा जास्त व्यवसाय करत आहे. ग्रामीण भागात बँक सुविधा देण्याचे काम येथील कर्मचारी देत आहेत. येथील कर्मचारी ग्राहकांना सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात. मसुरे गावाला पर्यटनातून सुबत्ता मिळण्यासाठी याभागातील कांदळगाव ते चांदेर मागवणे रस्त्याला चालना मिळावी आणि मसुरे गावचे नाव ग्रामपंचायत दप्तरी पुन्हा मसुरे मर्डे केले जावे अशी मागणी परब यांनी माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्याजवळ केली.

प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले. यावेळी सरव्यवस्थापक देवानंद लोकेगावकर, वेरली सरपंच धनंजय परब, डॉ विश्वास साठे, प्रफुल्ल प्रभू, महेश बागवे, छोटू ठाकूर, लक्ष्मी पेडणेकर, जितेंद्र परब, संग्राम प्रभुगावकर, जगदीश चव्हाण, तात्या हिंदळेकर, शिवाजी परब, संतोष पालव, बँक सरव्यवस्थापक देवानंद लोकेगावकर, पी. डी. सामंत, शरद सावंत, पूर्णांनंद सरमळकर, स्वप्नील केळुसकर, शाखा धिकारी संतोष गावकर, एस. एल. ठाकूर, विनीत लुडबे, एम. के. माळकर, मामा पेडणेकर, श्री एकनाथ तावडे, पांडुरंग ठाकूर, ओंकार ठाकूर तसेच बँक ग्राहक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!