वैभव नाईकांकडून अगोदर स्वतःच्या वाडीचा विकास करून घ्या, नंतर धनगर वस्त्यांबाबत बोला…

ठाकरे गटाच्या नवनाथ झोरे यांना भाजपाच्या सुशील खरात यांचा सल्ला

बाळा गोसावी धनगर समाजाच्या विकासासाठी रस्त्यावर उतरतात, झोरेंची तालुक्यात ओळख काय ?

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपाच्या भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा गोसावी यांच्यावर टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे देवली ग्रा. पं. सदस्य नवनाथ झोरे यांचा भाजपाच्या भटके विमुक्त आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सुशील खरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. स्वयंघोषित पुढारी नवनाथ झोरे यांनी आमदार वैभव नाईकांकडून अगोदर स्वतःच्या वाडीचा विकास करून घ्यावा, नंतर धनगर वस्त्यांबाबत बोलावे, असे सांगून बाळा गोसावी काचेच्या घरात राहून देखील धनगर समाजासाठी झटतात. समाजाच्या विकासासाठी रस्त्यावर उतरतात. जनता त्याला साक्ष आहे. नवनाथ झोरे तुम्हाला तालुक्यात कोण ओळखते ? तुमचे कार्य काय..?असा सवाल त्यांनी केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तुम्ही एकमेवच ग्रामपंचायत सदस्य पण भाजपचे बिनविरोध व निवडून आलेले सरपंच, उपसरपंच, ग्रा प सदस्य अनेक आहेत, असे सुशील खरात यांनी म्हटले आहे.

मालवण तालुक्यातील राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विरुद्ध भाजप असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी यांच्यात शाब्दिक युद्ध चालू होती. त्यात शिवसेना उद्धव गटाचे देवली ग्रामपंचायत सदस्य नवनाथ झोरे यांनी उडी मारत भाजपच्या बाळा गोसावी यांच्या वर टीका केली. त्यावर भाजप भटके विमुक्त आघाडी मालवण तालुका उपाध्यक्ष सुशील खरात यांनी झोरे यांचा खरपुच समाचार घेतला. खरात यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात असे म्हटले आहे की, स्वयंघोषित पुढारी नवनाथ झोरे यांनी बाळ गोसावी यांच्यावर टीका करण्यापेक्षा आमदार वैभव नाईक यांच्याकडून स्वतःच्या वाढीचा विकास तरी करून घ्यावा, पहिला स्वतःच्या घरी जाण्याचा रस्ता बनवा नंतर मालवण तालुक्यातील धनगर वस्तीच्या विकासाबाबत बोला. नवनाथ झोरे यांना तालुक्यात किती धनगर वस्त्या आहेत याची तरी माहिती आहे का..? माहिती असेल तर जाहीर करावी. बाळा गोसावी काचेच्या घरात राहून देखील धनगर समाजासाठी त्यांच्या विकासासाठी रस्त्यावर उतरतात या सर्व गोष्टीला जनता साक्षी आहे, बाळा गोसावी यांच्याकडे भाजपा भटके विमुक्त आघाडीचे मालवण तालुका अध्यक्षपद असताना तालुक्यातील धनगर वस्त्यांवरती भेटी गाठी घेणे त्यांच्या समस्या जाणून घेणे त्यांच्यावर होणारे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे अशा प्रकारचे अनेक विषय हात घेऊन त्यांनी जनजागृती केली आहे, धनगर समाजाला न्याय मिळवण्यासाठी त्यांनी विविध विभागाकडे नागपूर येथे झालेल्या भटके विमुक्त आघाडीच्या अधिवेशनात पत्रव्यवहार करत धनगर समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात, धनगर समाजाला राजकीय क्षेत्रात स्थान मिळण्यासाठी देखील आवाज उठवला आहे. अशा व्यक्तीवर टीका करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. ओवळीये धनगरवाडी येथे स्फ़ोटकामुळे वस्तीला धोका पोहोचवण्यात येत होता. त्यावेळी तुम्ही कुठे होता. नवनाथ झोरे कुठल्या बिळात लपून बसले होते. धनगर समाजाच्या जीवाचे रक्षण करण्याकरिता गोसावी साहेबच देवदूत म्हणून धावले होते. कोण नवनाथ झोरे…? तालुक्यात कोण ओळखते त्यांना ? काय केले त्यांनी धनगर समाजासाठी ते पुराव्यानिशी सिद्ध करावे असे सुशील खरात यांनी म्हटले आहे.

मालवण तालुक्यात तुम्ही एकटेच धनगर समाजाचे शिवसेना सदस्य असाल पण भाजपमध्ये तालुक्यासहित संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले धनगर समाजाचे सरपंच आहेत. निवडून आलेले उपसरपंच आहेत. सदस्य आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी तालुक्यात सभापती उपसभापती तर आता विद्यमान नगरसेवक नगरपंचायत सभापती पदावर देखील धनगर समाज बंधू-भगिनींना संधी मिळाली आहे. तालुक्याचे संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कुठेही असे दिसून येत नाही. वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून धनगर समाजाला सापत्न वागणूक मिळाली आहे. याचे जिवंत उदाहरण स्वतः तुम्हीच आहात. तुम्ही आमदार वैभव नाईक यांच्या पाठिंब्यावरती जर निवडून आला होता तर मग ग्रामपंचायत ची सत्ता तुमच्या आमदारांच्या हाती असताना देखील तुम्हाला उपसरपंच पद का दिले नाही याचे उत्तर देखील प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जनतेला द्या. यावरून आपली पात्रता काय ती आपण ओळखावी. आपण आरशासमोर उभे राहून आपण कोण आहोत याच आत्मपरीक्षण झोरे यांनी करावं आणि मगच आमचे नेते बाळा गोसावी यांच्यावर टीका करावी. समाजाच्या समस्या सोडवण्याकरिता काचेचे किंवा मातीच्या घराची आवश्यकता नसून समाजप्रती असणाऱ्या प्रेमाची आणि समजा सेवेची आवड असण्याची गरज असते आणि गोसावी यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला आहे व याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत तुम्ही एखाद्या जरी धनगर वस्ती वरती गेला असल्याचा पुरावा आम्हाला द्यावा. उगाच उचलली जीभ की लावणी टाळ्याला कोणतरी सांगतो म्हणून पत्रक देऊन कार्य करणाऱ्या व्यक्ती वरती टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा खटापोप झोरे यांनी करू नये. धनगर समाजाला सापत्न वागणूक शिवसेना उद्धव गटांकडून कायमस्वरूपी मिळालेली आहे. तालुक्यातील धनगर समाज विकासापासून वंचित असण्याचे कारण आमदार वैभव नाईक आहेत. अनेक धनगर वस्तीवर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमीतून रस्ते मंजूर करावे लागत होते. सात वर्षे सत्ताधारी आमदार असून देखील एकाही धनगर वस्ती वरती आमदार फंड का दिला नाही..? काळसे धनगरवाडा, हिवाळे धनगरवाडा, वेरली धनगर वाडा ओवलिये धनगरवाडा, असरोंडी धनगरवाडा अशा अनेक धनगर वस्ती आहे, जिथे अद्याप रस्ता नाही काही ठिकाणी स्मशानभूमी नाही हे सत्य आहे. काम चुकार नेत्यांची चमचेगिरी सोडून समाजसेवा करा समाजाचे प्रश्न मांडा. अनेक ठिकाणी धनगर समाज भीतीचे वातावरणात जगत आहे आणि याकरता अनेक वेळा गोसावी समाजाला धीर देत समाजाला साथ देत समाजाच्या प्रश्नांवरती आवाज उठवत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या धनगर समाजाचा विकास होईल त्यामुळे आमचे नेते गोसावी यांच्यावर टीका केल्यास आम्ही गप्प नाही असा इशारा सुशील खरात यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून झोरे यांना दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!