समाजातून कौटुंबिक वाद विवाद, कलह दूर करण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मार्गदर्शक बना !

ॲड. रुपेश परुळेकर यांचे प्रतिपादन ; महिला सक्षमीकरणासाठी मोफत कायदेविषयक सल्ला देण्याची मालवण

महिला बालविकास विभागामार्फत मालवणात महिला दिन साजरा ; डॉ. राहुल पंत वालावलकर यांचेही आरोग्य विषयक मार्गदर्शन

मालवण | कुणाल मांजरेकर

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आज समाजात कौटुंबिक वादविवाद, कलह यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातून विवाह संस्कृती लोप पावत चालली आहे. ही परिस्थिती बदलण्याची क्षमता फक्त स्त्री मध्येच आहे. स्त्री ही आदिमाया, आदिशक्ती आहे. जे एक स्त्री करू शकते ते पुरुष करू शकत नाही. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा गावातील वाडीवाडीत चांगला संपर्क असतो. त्यामुळे ज्यांच्यात कौटुंबिक वाद, कलह आहेत अशांसाठी अंगणवाडी सेविकांनी दीपस्तंभ बना, त्यांचे मार्गदर्शक बना. जेणेकरून कुटुंबव्यवस्था टिकेल, असे प्रतिपादन मालवण मधील प्रख्यात ॲड. रुपेश परुळेकर यांनी येथे बोलताना केले. महिला सक्षमीकरणाच्या कार्यासाठी मोफत कायदेशीर सल्ला देण्या ची तयारीही त्यांनी दर्शवली.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प विभागाच्या वतीने कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उदघाटन डॉ. राहुल पंतवालावलकर, ॲड. रुपेश परुळेकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी कौमुदी पराडकर, मुख्यसेविका स्नेहा सामंत, उल्का खोत, प्राजक्ता तुळसकर, स्नेहल गावडे, मंगल जंगले यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ॲड. परुळेकर म्हणाले, महिलांवर होणारे अत्याचार, अन्यायाच्या विरोधात महिला उभ्या राहणार नाहीत, तोपर्यंत अत्याचार करणाऱ्यांना अत्याचार करता नये याबाबतची दहशत निर्माण होणार नाही. त्यामुळे महिलांनी अशा प्रकारांविरोधात सक्षमपणे उभे राहून लढा द्यायला हवा. आज समाजातील वाढत्या घटस्फोटांची प्रकरणे पाहता विवाहसंस्कृती संपत चालली आहे का अशी भीती निर्माण झाली आहे. प्रत्येकाला दोष देऊन यातून मार्ग सुटणार नाही. त्यामुळे महिलांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कुटुंबातील वाद हे कुटुंबातच मिटविले पाहिजेत. स्त्रीची जशी समजून घेण्याची जबाबदारी आहे तशीच ती पुरुषाचीही आहे. स्त्रीचा आत्मसन्मान आपण ठेवायला पाहिजे. जी जी माणसे मोठी झाली त्यात महिलांचे योगदान मोठे राहिले आहे, असे ते म्हणाले. नातं टिकवायचं असेल तर पुरुष आणि स्त्री या दोघांपैकी कोणीतरी झुकलं पाहिजे. दोघांनी समजून घेतलं तर आयुष्य खूप सुंदर आहे. अतिस्वाभिमानामुळे अनेकदा नाती उध्वस्त झाली आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. पंतवालावलकर यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – पाककृती स्पर्धा
प्रथम- घावणे भाजी, विद्या सावंत वायंगणी अमरेवाडी, द्वितीय- खोबऱ्याची वडी, भारती दळवी, तळगाव देऊलवाडी, तृतीय- शेवगा भाजी भाकरी, सोलकडी, वैभवी भांडारकर, काळसे माळकरवाडी, अनौपचारिक शिक्षण हस्तकला- प्रथम- धामापूर बौद्धवाडी, सेविका शीतल नाईक, द्वितीय- सर्जेकोट, सेविका सीमाली परब, तृतीय- त्रिंबक बागवेवाडी, सेविका वर्षा जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन उल्का खोत यांनी केले. स्नेहा सामंत यांनी आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!