“महंगाई का गाये गाना, बिना गॅस पकाये खाना …” : मालवणात ठाकरे गटाचं अनोखं “खिचडी पकाव” आंदोलन

महागाई निर्माण करणाऱ्या भाजपा – मिंधे सरकारचा फास आवळल्या शिवाय जनता स्वस्थ बसणार नाही ; हरी खोबरेकरांचं टिकास्त्र

मालवण | कुणाल मांजरेकर

“मोदी सरकार हाय हाय…”, “फडणवीस -शिंदे भाई है, महाराष्ट्र मे महंगाई छाई है…”, “बस हुई महंगाई की मार, नही चाहिये मोदी सरकार…”, “आवाज कुणाचा… शिवसेनेचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो…” अशा घोषणा देत आणि लाकडानी पेटवलेल्या चुलीवर खिचडी शिजवत शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गॅस दरवाढ आणि महागाई विरोधात राज्य व केंद्र सरकारचा निषेध करून अनोखे आंदोलन करण्यात आले.

केंद्रातील भाजपाचं सरकार आणि राज्यातील गद्दार सरकार च्या माध्यमातून जनतेचे हाल सुरु आहेत. रोजगार आणि उद्योगधंदे मिळणार असं सांगून सर्वसामान्यांच्या घरातली चुल बंद करण्याचा डाव या सरकारने आखला आहे. त्यामुळे महागाई निर्माण करणाऱ्या भाजपा – मिंधे सरकारचा फास आवळल्या शिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी होळी नंतर आमच्या सारखे शिवसैनिक गावागावात जाऊन या सरकारच्या विरोधात रान पेटवतील, असा इशारा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेसमोर शुक्रवारी महागाई विरोधात आंदोलन छेडण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नितीन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, महिला आघाडीच्या पूनम चव्हाण, सेजल परब, शिल्पा खोत, तृप्ती मयेकर, निनाक्षी मेतर, विद्या फर्नांडिस, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, सन्मेष परब, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, उमेश मांजरेकर, भगवान लुडबे, नरेश हुले, सिद्धेश मांजरेकर, यशवंत गावकर, गौरव वेर्लेकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.

श्री. खोबरेकर म्हणाले, राज्यातील गद्दार सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांनी महागाई वाढवून जनतेचे हाल केले आहेत. २०१४ पासून गॅस सिलेंडरची किंमत तिप्पट वाढली आहे तर पेट्रोलचे भावही गगनाला भिडले आहेत. उद्योग, रोजगार याची केवळ आश्वासने देऊन दुसरीकडे महागाई वाढवली जात आहे. अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावर सरकार काहीच बोलत नाही. त्यासाठी किरकोळ विषयांचा बाऊ करून लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे. महाराष्ट्रावर बोलणाऱ्या इतरांचा सत्कार करायचा आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणायचा असे प्रकार हे सरकार करीत असून महागाईमुळे जनतेला पुन्हा चुली पेटवाव्या लागणार आहेत. म्हणूनच आज आम्ही चुलीवरील खिचडीचे आंदोलन छेडत निषेध केला. मोदी सरकारने गॅस योजना राबवून घराघरात गॅस सिलेंडर दिले, मात्र त्याच गॅसद्वारे लूट करून सरकार गरीबांच्या तोंडातील घास हिरावून घेणार याची कल्पना जनतेला नव्हती. मात्र आम्ही सरकारच्या गळ्याचा फास आवळल्याशिवाय गप्प बसणार नाही, आजचे आंदोलन यापुढेही व्यापक प्रमाणात करून सरकारच्या विरोधात जिल्हाभरात रान पेटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही खोबरेकर यांनी यावेळी दिला.

यावेळी बोलताना नितीन वाळके म्हणाले, खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजपचे, मोदी सरकारचे पितळ आज महागाईचा आगडोंब उसळल्याने उघडे पडले आहे. पेट्रोल, गॅस सिलेंडर व वीज दरवाढ जनतेच्या सहनशीलते पलीकडची आहे. महागाईतून सरकारने शेतकरी आणि गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे. भविष्यात वीज दरात ३७ % दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या साधारणत: ८ रुपये प्रतियुनिट असलेले घरगुती वीज दर ११ रुपये प्रती युनिट होणार आहेत. एकीकडे महागाईचा आगडोंब उसळला असताना दुसरीकडे कांदा निर्यात धोरणातील त्रुटींमुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने कांदा घेऊन खुल्या बाजारात ग्राहकांना २० ते ४० रुपये दरानेच विकला जात आहे. त्यामुळे मधल्या रक्कमेतून मिंधे गटाच्या खरेदीसाठी वापरलेल्या खोक्यांची वसुली केली जात आहे. हे सरकार सर्व पातळीवर नालायक ठरले असून कसबा पोटनिवडणुकी मधून जनतेने त्यांना इशारा दिला आहे, त्यामुळे या विरोधात व्यापक स्वरूपात आंदोलन पेटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे नितीन वाळके म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!