तोंडवळी सुरु बनातील रस्त्यासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण

उपलब्ध निधी व प्रशासकीय मान्यतेबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार

मालवण : तोंडवळी येथील वन विभागाच्या जागेतील ६०० मीटर मार्गासह एकूण साडे पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम होण्यासाठी येथील ग्रामस्थ एकवटले आहेत. येथील ग्रामस्थांनी बुधवार पासून आमरण उपोषण छेडले असून रस्त्याबाबत निधी उपलब्धता व प्रशासकीय मान्यतेबाबत जोपर्यंत प्रशासकीय पातळीवर लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार तोंडवळी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

तोंडवळी येथील रस्ताप्रश्नी सरपंच नेहा तोंडवळकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तोंडवळी सुरू वन याठिकाणी बुधवारी आमरण उपोषण सुरू केले आहे. या संपुर्ण रस्त्यासाठी सुमारे २ कोटींपेक्षा जास्त निधी व वन विभागातील रस्ता प्रश्नी केंद्रीय वन पर्यावरण विभागाची मान्यता आवश्यक आहे. याबाबत ठोस आश्वासन ग्रामस्थांना अपेक्षित आहे. बुधवारी उपोषण स्थळी सरपंच नेहा तोंडवळकर यांसह उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुजाता पाटील, स्नेहल पाटील, मानसी चव्हाण, अनन्या पाटील, माजी सरपंच आबा कांदळकर, जयहरी कोचरेकर, गणेश तोंडवळकर, संजय केळुसकर, दीपक कांदळकर, वासुदेव पाटील, आशिष पाटील, ताता टिकम, ऍड ओंकार केणी यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

तोंडवळी सुरू बन येथून जाणाऱ्या रस्त्यासाठी पर्यावरण, वन विभागाची परवानगी आवश्यक आहे, ती परवानगी मिळणे बाकी आहे. तत्पूर्वी संपूर्ण रस्त्यासाठी निधी उपलब्ध होऊन प्रशासकीय मान्यता मिळणे ही सर्वात महत्वाची बाब आहे. निधी मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा सूर उपोषणकर्त्यानी व्यक्त केला.

उपोषणस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कमलिनी प्रभू, शाखा अभियंता प्रमोद कांबळे, शाखा अभियंता आर. एस. पवार, वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे, वनअधिकारी श्रीकृष्ण परीट, अनिल परब यांनी भेट दिली. वन विभागाने आपल्याकडून आवश्यक असणारे सहकार्य केले जाईल असे सांगितले. मात्र केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी महत्वाची असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधीचे पत्र प्राप्त आहे. मात्र त्याला प्रशासकीय मान्यता नाही. तसेच बजेट अंतर्गत निधीची मागणी करण्यात आली आहे, असेही सांगितले.

पोलिसांकडून नोटीस

उपोषणकर्त्या ग्रामस्थांना मालवण पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने मनाई आदेशाचा भंग झाल्यास किंवा दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्याचे कृत्य घडल्यास आपल्याला जबाबदार धरून कारवाई केली जाईल, अशा आशयाची नोटीस पोलिसांनी उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी दिली. मात्र ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने नियोजित उपोषण सुरू असल्याचे सांगितले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक विजय यादव व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत उपोषणा बाबत तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीबाबत माहिती घेतली. होमगार्ड बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला आहे.

न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार..!

तोंडवळी सुरू बन व परिसरातील रस्त्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. सद्यस्थितीत अपूर्ण व नादुरुस्त रस्त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे रस्त्यासाठी निर्णायक लढा ग्रामस्थ लढत असून जोपर्यंत निधी बाबत प्रशासकीय लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!