व्यायामशाळेचं साहित्य निकृष्ट होतं तर आ. वैभव नाईकांनी उद्घाटन केलंच का ?

हेच साहित्य दुसरीकडे नेऊन आणखी एक उद्घाटन करायचं होतं का ?

भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा सवाल ; तोंडवळी- देवबागच्या बंधाऱ्यावरही स्पष्टीकरण

आ. नाईक कोणकोणासोबत बैठका घेतायत, त्याची माहिती घ्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल ; शिवसैनिकांना सल्ला

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेतील साहित्य निकृष्ट असल्याचं उदघाटनावेळीच लक्षात आलं होतं, तर आमदार वैभव नाईक यांनी त्यावेळी या व्यायामशाळेचं उद्घाटन केलंच का ? असा सवाल भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केला आहे. वैभव नाईक यांची बाजू घेऊन तावातावाने भांडणाऱ्या शिवसैनिकांनी अगोदर आमदार सध्या कोणासोबत बैठका घेत आहेत, याची माहिती घ्यावी, अन्यथा मागाहून पश्चाताप करायची वेळ येईल, असा सल्लाही चिंदरकर यांनी दिला आहे.

शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेत २५ लाख रुपये खर्चून उपलब्ध झालेल्या व्यायाम साहित्याचे उद्घाटन आ. नाईक यांच्या हस्ते अलीकडेच करण्यात आले. त्यानंतर हे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार येताच भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता हे साहित्य गायब असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरून निलेश राणे यांनी आ. नाईक यांच्यावर शहरवासीयांची फसवणूक केल्या प्रकरणी ४२० चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. त्यावरून शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी राणेंवर टीका केली होती. त्याला भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. व्यायामशाळेचे साहित्य निकृष्ट दर्जाचे असताना आमदार वैभव नाईक यांनी उदघाटनच का केलं, याच उत्तर द्यावं, असे सांगून तेच साहित्य दुसऱ्या ठिकाणी दाखवून अजून २५ लाख उकळायचे होते का ? ज्या अर्थी ते साहित्य उदघाटन करून तिथून हलवलं गेलं, याचा अर्थ ते दुसऱ्या ठिकाणी दाखवून अजून एक उदघाटन करायचं होतं. राहिला प्रश्न प्रशासकीय ज्ञानाचा. प्रशासकीय ज्ञानावर कोण बोलतं ? ज्यांना सत्ता मिळाल्यावर कशा कशासाठी राबवायची ते समजत नव्हतं. निकृष्ट दर्जाची कामे करून फक्त सत्तेचा वापर स्वतःसाठी करायचा एवढंच माहित असलेल्यानी प्रशासनातील गोष्टी शिकवू नये. राहिला प्रश्न देवबाग, तळाशील बंधाऱ्याचा. क्रोसेक्शन सर्वेसाठी आम्ही आवाज उठविल्यानंतर पैसे भरले गेले. तो सर्वे करण्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केला होता का ? याचे ज्ञान नाही आणि प्रशासनाच्या गोष्टीवर तुम्ही बोलणे म्हणजे एक प्रकारचा विनोद आहे. जोपर्यंत क्रोसेक्शन सर्वे होत नाही तो पर्यंत ते काम होणार नव्हतं, हे सुद्धा माहित नाही ? राहिला प्रश्न देवबाग बांधाऱ्याचा तर त्या साठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक कोटी निधी दिला. मात्र सत्तेचा गैरवापर करून आपली मते विरोधात जाण्याच्या धास्तीने तिकडे कोलदांडा घालण्याचे काम कोणी केले, त्याचे उत्तर द्यावे.

अरे कुठे कुठे भ्रष्टाचार करायचा ठेवलात ?

आज रस्त्यांची दैनावस्था झालेली आहे. त्याला जबाबदार कोण ? तुमच्या सत्तेच्या कारकिर्दीत केलेले रस्ते केवळ एका वर्षात निखळून पडले. जिओ ट्यूब वाहून गेल्या. अरे कुठे कुठे भ्रष्टाचार करायचा ठेवलात ? तेव्हा आता शांत बसा प्रशासन कस पळवायचं, त्यासाठी तुमच्याकडून धडे घ्यायची गरज नाही, असे सांगून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जास्त तावातावात भांडू नये. आमदार साहेब कोणाकोणाशी सध्या बैठका घेत आहेत त्याची माहिती घ्या. आता सत्ता भाजप व अधिकृत शिवसेनेची आहे, तेव्हा शांत बसा, असा सल्ला धोंडू चिंदरकर यांनी दिला आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!