
JNU मध्ये २ सप्टेंबरला ‘शिवराज भूषण’चा भव्य दहावा प्रयोग ; प्रथमच हिंदी भाषेत होणार सादरीकरण
मालवण : मालवणच्या मातीतून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांचा भव्य नाट्यमय आविष्कार ‘शिवराज भूषण’ महानाट्य आता थेट देशाच्या राजधानीत धडकणार आहे. या बहुचर्चित महानाट्याचा दहावा प्रयोग २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रंगणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक विश्वासाठी हा क्षण विशेष अभिमानाचा ठरणार आहे.

मालवणच्या भूमीतून सुरू झालेला ‘शिवराज भूषण’चा कलाप्रवास आज महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. JNU सारख्या देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या व्यासपीठावर महानाट्याचा दहावा प्रयोग सादर होणे, ही मालवणच्या सांस्कृतिक वैभवाची राष्ट्रीय पातळीवरील दखल मानली जात आहे. या महानाट्याची निर्मिती व संकल्पना करणारे भूषण साटम आणि दिग्दर्शक गणेश मेस्त्री यांची पत्रकार परिषद शुक्रवारी हॉटेल रापण रियासत येथे घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेत महानाट्याच्या दिल्ली प्रयोगाची माहिती देताना त्यांनी महानाट्याच्या प्रवासाची तसेच दिल्लीतील प्रयोगाच्या तयारीची माहिती दिली. यावेळी संजय शिंदे, भाऊ सामंत, समीर शिंदे, शुभदा टिकम, पूजा सरकारे, साक्षी मयेकर, संकेत कुवेसकर, विवेक परब, उमेश परुळेकर आणि नितीन तोडणकर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष, स्वराज्याची संकल्पना, दूरदृष्टी, शौर्य आणि राष्ट्रनिर्मितीचा विचार प्रभावीपणे नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ‘शिवराज भूषण’मधून करण्यात आला आहे. इतिहासाची ताकद, कलाकारांचा दमदार अभिनय, प्रभावी संगीत, भव्य नेपथ्य, प्रकाशयोजना आणि दिमाखदार सादरीकरण यामुळे हे महानाट्य प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव ठरत आहे.
मालवणचा आवाज आता दिल्लीच्या रंगमंचावर
या महानाट्याचा दिल्लीतील दहावा प्रयोग महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालय, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि श्री शिवशंभो विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. श्री शिवराज मंच, मालवण यांच्या वतीने हे महानाट्य सादर केले जाणार आहे.
दिल्ली दौऱ्यासाठी सिंधुदुर्गातील कलाकार, तंत्रज्ञ आणि रंगकर्मी सज्ज झाले आहेत. आपल्या मातीत घडलेली ही कलाकृती देशाच्या राजधानीत सादर करण्याची संधी मिळाल्याने संपूर्ण टीममध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दहावा प्रयोग असल्याने या प्रयोगाला विशेष महत्त्व असून, मालवणच्या नाट्यपरंपरेचा आणि शिवरायांच्या विचारांचा निनाद दिल्लीच्या भूमीत पोहोचणार आहे.
शिवरायांचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प‘शिवराज भूषण’ हे केवळ ऐतिहासिक महानाट्य नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या मूल्यांचा जागर करणारे प्रभावी माध्यम म्हणून या कलाकृतीकडे पाहिले जात आहे. इतिहासाला रंगभूमीच्या माध्यमातून जिवंत करताना नव्या पिढीला शिवरायांच्या कर्तृत्वाची आणि विचारांची ओळख करून देण्याचा प्रयत्न या महानाट्यातून करण्यात आला आहे.
मालवणच्या भूमीत जन्मलेली ‘शिवराज भूषण’ची कलाकृती आता राजधानीच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर पोहोचली आहे. त्यामुळे २ सप्टेंबरचा JNUमधील दहावा प्रयोग हा केवळ एका महानाट्याचा प्रयोग न राहता, सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक सामर्थ्याचा दिल्लीच्या भूमीवर उमटणारा ठसा ठरणार आहे.






Subscribe to my channel






