आंबा-काजूवर प्रक्रिया उद्योग उभारा; पुढील पिढीला उद्योजक बनवा!

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे आवाहन; मालवण व्यापारी संघातर्फे सन्मान

मालवण : सिंधुदुर्गच्या मातीत निर्माण होणाऱ्या आंबा, काजू, फणस, कोकम यांसारख्या कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात उभे राहिले पाहिजेत. या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी डिजिटल मार्केटिंगवर भर देणे गरजेचे आहे. स्थानिक उद्योग-व्यवसायाला चालना देतानाच पुढील पिढीला उद्योजकतेसाठी सक्षम करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व माजी खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खासगी दौऱ्यावर आलेल्या डॉ. भागवत कराड यांचा मालवण व्यापारी संघातर्फे दैवज्ञ भवन येथे संवाद सभा व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यापाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सिंधुदुर्गच्या आर्थिक विकासासाठी स्थानिक उत्पादनांना उद्योगाची जोड देण्याची गरज अधोरेखित केली.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून कार्यरत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या करविषयक विविध अडचणी सोडविण्यासाठी डॉ. कराड यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मालवण व्यापारी संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर व महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष रामभाऊ भोगले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन डॉ. कराड यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. कराड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित आणि मजबूत आर्थिक महासत्ता म्हणून भारत घडविण्याच्या संकल्पाचा उल्लेख केला. भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये व्यापार आणि उद्योग क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याने आपल्या स्थानिक उत्पादनांच्या माध्यमातून या विकासात मोठे योगदान देऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग हा पर्यटनाच्या दृष्टीने वेगाने पुढे जात असतानाच कृषी व स्थानिक उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना मिळाली, तर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. स्थानिक भूमिपुत्रांच्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही डॉ. कराड यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच नारायण राणे आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांसारख्या अनुभवी नेतृत्वाच्या सहकार्याने सिंधुदुर्गच्या विकासासाठी आपणही खारीचा वाटा उचलू, असे डॉ. कराड यांनी नमूद केले.

दरम्यान, चिपी विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने लवकरच बैठक घेण्यासाठी प्रयत्न करणार, अशी महत्त्वाची माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे व्यापारी व उद्योजकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.यावेळी रामभाऊ भोगले यांनीही मनोगत व्यक्त केले. नितीन वाळके यांनी प्रास्ताविक केले, तर विजय केनवडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाला सौ. अंजली कराड, मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष दीपक भोगले, जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके, डॉ. सोमवंशी, जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन तायशेटे, विजय केनवडेकर, सुहास ओरसकर, अभय कदम, गणेश प्रभुलकर, नाना साईल, रविकिरण तोरसकर, प्रसाद पारकर, प्रमोद नलावडे, मधू नलावडे, पी. डी. शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, राजन नाईक, अमित भोगले, पूजा वाडकर, आकांक्षा शिरपुटे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!