गॉगल काढा, डोळे उघडा; मग विकास दिसेल!

बाबी जोगींवर दीपक पाटकरांचा घणाघात; “नाहक टीका कराल तर जशास तसे उत्तर देऊ”

भूमिगत वीजवाहिनीवरून श्रेयवादाचे राजकारण; “वस्तुस्थिती न पाहता आरोप करणे बंद करा”

मालवण : मालवण शहरातील भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडल्याचा आरोप करत नगरपरिषदेवर टीका करणारे उबाठा गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांना शिवसेना शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. “बाबी जोगी, आधी गॉगल काढा आणि डोळे उघडा, विकासकामांची वस्तुस्थिती स्पष्ट दिसेल. नाहक टीका कराल तर जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा थेट इशारा पाटकर यांनी दिला.

भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाबाबत नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून आवश्यक प्रक्रिया सुरू असताना केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी काम रखडल्याचा आरोप करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे पाटकर यांनी म्हटले आहे.

“एखादा प्रकल्प मंजूर झाला म्हणजे दुसऱ्याच दिवशी काम पूर्ण होत नाही. त्यासाठी प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक प्रक्रिया, संबंधित विभागांशी समन्वय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी असे अनेक टप्पे असतात. बाबी जोगींनी आधी या प्रक्रियेचा अभ्यास करावा आणि मग आरोप करावेत,” असा टोला पाटकर यांनी लगावला.

काम आमचे, श्रेय तुमचे; ही उबाठाची जुनी सवय!

“भूमिगत वीजवाहिनी योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लागली आहे. काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे. मात्र, कामाचे श्रेय घेण्यासाठी उबाठाकडून सुरू असलेली धडपड हास्यास्पद आहे. विकासकामे करण्याची क्षमता नसताना झालेल्या कामांवर श्रेय घेण्याची घाई करणे, ही उबाठाची जुनी सवय आहे,” अशी जोरदार टीका पाटकर यांनी केली.“बाबी जोगी किंवा त्यांचे माजी आमदार वैभव नाईक यांचा या भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाशी नेमका संबंध काय? त्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे. संबंध नसलेल्या कामाचे श्रेय घेण्याआधी वस्तुस्थिती तपासावी,” असे आव्हानच पाटकर यांनी दिले.

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ राजकारण थांबवा

पाटकर म्हणाले, “एखाद्या विकासकामाची माहिती न घेता आरोप करायचे, प्रशासनावर टीका करायची आणि त्याच कामाचे श्रेयही घेण्याचा प्रयत्न करायचा, हा दुटप्पीपणा मालवणची जनता ओळखते. ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ अशा पद्धतीचे राजकारण आता बंद करा.” मालवण शहरातील वीजपुरवठा सुरळीत राहावा आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी नगरपरिषद प्रशासन संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधत आहे. भूमिगत वीजवाहिनीचे काम योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असून, त्याबाबत कोणतीही घाईगडबड न करता दर्जेदार काम करून घेणे हीच नगरपरिषदेची भूमिका असल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले.

राणे कुटुंबीयांच्या माध्यमातून विकासाला गती

“खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासकामांचा धडाका सुरू आहे. जनतेला सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष मैदानात काम करतोय. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करणाऱ्यांनी आधी आपल्या कार्यकाळाचा आरसा पाहावा,” असा घणाघात पाटकर यांनी केला.

बाबी जोगींनी टीका करण्यापूर्वी आपल्या पक्षाच्या कार्यकाळातील कामांचा हिशेब जनतेसमोर मांडावा. विकासकामांची प्रत्यक्ष स्थिती न तपासता राजकीय आरोप केल्यास त्यांना प्रत्युत्तर देण्यास शिवसेना मागेपुढे पाहणार नाही, असेही पाटकर यांनी स्पष्ट केले.

“जनतेच्या विकासाच्या कामात राजकारण आणू नका. नाहक टीका कराल, तर प्रत्येक आरोपाला जशास तसे आणि पुराव्यानिशी उत्तर दिले जाईल. गॉगल काढा, डोळे उघडा आणि मग मालवणमध्ये सुरू असलेला विकास पाहा!” असा जोरदार पलटवार दीपक पाटकर यांनी केला.

error: Content is protected !!