आ. वैभव नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे  मातोश्रीची ‘फसवणुक’

मनसेची टीका : बंडखोर आमदार उदय सामंत, दीपक केसरकर यांना दुखावणे टाळले

मालवण : बंडखोर आमदार उदय सामंत, दीपक केसरकर यांना न दुखवता आमदार वैभव नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे मातोश्रीची ‘फसवणुक’ असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे. 

वैभव नाईक शिवसेनेचे सर्व आमदार जरी गेले तरी मी शिवसेनेत राहणार असल्याचे सांगत आहेत, शक्तीप्रदर्शन करत आहेत. सेनेच्या कार्यकर्त्याना स्वतः फटाके देऊन, गाडीतून झेंडे, बॅनर नेऊन स्वतःचा सत्कार घडवून आणत आहेत. पण अन्य जिल्ह्यांमध्ये सेनेत गद्दारी केलेल्यांचा निषेध, शाई फेक, जोडे मारो, पुतळे जाळणे अशी आंदोलने होत असताना जिल्ह्यातील सेनेच्या बंडखोरांबाबत चकार शब्दही ते काढत नाहीत किंवा साधा निषेधही करत नाहीत. शिंदे गटात सामील झालेल्या बंडखोर पालकमंत्री उदय सामंत,आमदार दिपक केसरकर यांच्याबाबतही बोलत नाही.फक्त आपला सत्कार घडवून आणतात याच गौडबंगाल काय ? असा सवाल त्यांनी केला आहे.

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा केली जाणार नाही. बंडखोर आमदांना त्यांच्या सोबत असलेल्यांना शिवसैनिक घरी पाठवल्या शिवाय स्वस्त बसणार नाहीत. जे शिवसेनेशी गद्दारी करीत आहे त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माफ करणार नाहीत अशी संतप्त भावना इतर जिल्ह्यांमध्ये आहे. पण सिंधुदुर्गात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि एक आमदार शिंदे गटात सामील झाले तरी आमदार नाईक फक्त आपण निष्ठावंत असल्याचाच ढोल बडवत आहेत. 

नारायण राणे भाजपात नसते तर आमदार वैभव नाईक सर्वप्रथम एकनाथ शिंदे गटात सामील झाले असते अशी चर्चा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि कुडाळ मालवणच्या मतदारांमध्ये आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या संबंधाना धक्का न लावता, न दुखावता सत्कार आणि निष्ठावंत एवढंच करून वैभव नाईक मातोश्रीची फसवणुक करत असल्याचे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!