यांत्रिकी मासेमारी नौकांना १२० अश्वशक्तीची मर्यादा काढून डिझेल कोटा व डिझेल परतावा पूर्ववत करा

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे निर्देश ; आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा

मुंबई : १२० अश्वशक्तीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या यांत्रिकी मासेमारी नौकांना १२० अश्वशक्तीची मर्यादा काढून डिझेल कोटा व डिझेल परतावा पूर्ववत करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मालवण व देवगड येथील मच्छीमार शिष्टमंडळासोबत मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

शुक्रवारी पुन्हा मच्छीमार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मंत्री श्री. शेख म्हणाले की, राज्यातील यांत्रिकी नौकांसाठी सन २००५ पासून मूल्यवर्धित कर प्रतिपुर्ती योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील १७० मच्छीमार सहकारी संस्था या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेनुसार मच्छीमार सहकारी संस्थांना यांत्रिकी मासेमारी नौकांसाठी खरेदी केलेल्या डिझेलच्या मूल्यवर्धित कराची रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे मच्छीमार लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा करण्यात येते. परंतु दि. १४ जानेवारी १९९७ च्या अर्धशासकीय शासन पत्रानुसार या योजनेस पात्र होण्यासाठी ६ सिलेंडर व १२० अश्वशक्ती क्षमतेच्या मर्यादेची अट टाकण्यात आली होती.

१५ ते २२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये ठाणे/पालघर येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयाचे महालेखापाल यांच्याकडून लेखापरिक्षण करण्यात आले. लेखापरिक्षण अहवालामध्ये सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, ठाणे-पालघर कार्यालयाकडून १२० अश्वशक्तीवरील सहा सिलेंडर क्षमतेच्या नौकांना डिझेल कोटा व त्यानुसार कर परतावा मंजूर केला असल्याबाबत आक्षेप नोंदविण्यात आला होता. परंतु सद्यस्थितीत मासेमारी पद्धतीमध्ये झालेले बदल, मासेमारीचे क्षेत्र, मासेमारी सफरीचे दिवस व इतर सर्व बाबींचा विचार करता १२० अश्वशक्तीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या नौकांना डिझेल कोटा व प्रतिपूर्ती मंजुर करण्याची तरतूद शासन निर्णयामध्ये करण्याची आवश्यकता आहे. याबाबत शुद्धीपत्रक काढुन लवकरच १२० अश्वशक्तीवरील यांत्रिकी नौकांना करमुक्त डिझेल परतावा सुरु करण्याचे निर्देश मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, अशी माहिती मंत्री अस्लम शेख यांनी दिली. एकूणच मच्छीमारांचे हित लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्याने मंत्री अस्लम शेख यांचे आमदार वैभव नाईक यांनी आभार मानले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!