
ठाकरे शिवसेनेच्या आचरा येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कणकवली महावितरण कार्यालयात धडक
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आचरा येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी कणकवली येथील महावितरण कार्यालयात धडक दिली. यावेळी कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे यांची भेट घेऊन आचरा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात आणि सबस्टेशनमध्ये सहाय्यक अभियंता व उपअभियंता पदे तात्काळ भरण्यात यावीत. त्याचबरोबर कार्यरत असलेले वायरमन यांची बदली करून आचरा येथे कायमस्वरूपी राहणारे वायरमन देण्यात यावेत आणि आचरा येथील विज समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अन्यथा आचरा तिठा येथे रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. त्यावर ३ तारीख पर्यंत नवीन वायरमन देण्याची तसेच आचरा येथील वीज समस्या सोडविण्याची ग्वाही जयंतीलाल भामरे यांनी यावेळी दिली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गेली सुमारे तीन ते चार वर्षे आचरा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे कार्यालयात व सबस्टेशनमध्ये सहाय्यक अभियंता व उपअभियंता पदे रिक्त आहेत. त्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहकांना व व्यापारी वर्गाला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सध्या कार्यरत असलेले वायरमन व अंशकालीन विद्युत सहाय्यक यांचा कोणीही अधिकारी नसल्यामुळे मनमानी कारभार चाललेला आहे. तरी तात्काळ सदरचे दोन्ही पदे भरून ग्राहकांना उचित सहकार्य करावे. न पेक्षा गडचिरोली जिल्ह्याच्या धर्तीवर निकष लावून दीडपट पगाराने नक्षलग्रस्त जिल्हा घोषित करून अधिकाऱ्यांची नेमणूक करावी तसेच आचरा येथील सध्याचे वायरमन मुख्यालयात राहत नसल्यामुळे त्यांना बदलून आचरा येथे कायमस्वरूपी राहणारे वायरमन यांची नेमणूक करावी. तसेच सदर क्षेत्रामधील झाडांच्या वाढलेल्या फांद्या कट करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी झाडांच्या फांद्या पडून सतत वीज पुरवठा खंडित होतो. तरी त्या फांद्या त्वरित कट करण्यात याव्यात. येत्या आठ दिवसात दोन्ही अधिकारी पदांची नेमणूक न झाल्यास, आचरा तिठा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल व सदर आंदोलनास आपण सर्वजण जबाबदार राहाल असा इशारा निवदेनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आचरा विभाग संघटक मंगेश टेमकर, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन राऊत, उपव्यवस्थापक सी.ई.मोरये,नारायण कुबल, श्यामसुंदर घाडी, श्रीकांत बागवे, राजू नार्वेकर, संजय वायंगणकर, केदार परुळेकर, श्री. माळगावकर, विठ्ठल सारंग, मयुरेश माडये, परेश तारी, अरविंद घाडी, विठ्ठल कुबल, संतोष गोरवले, हरी साटम आदी उपस्थित होते.





Subscribe to my channel






