‘व्हॅलेंटाइन डे’ ची कुप्रथा रोखण्यासाठी युवापिढीला धर्मशिक्षण आवश्यक

हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक हर्षद खानविलकर यांचे प्रतिपादन

कुणाल मांजरेकर

मालवण : ज्या ‘व्हॅलेंटाइन’च्या नावे व्हॅलेंटाईन दिवस साजरा केला जातो, त्या कथित ‘संत व्हॅलेंटाईन’च्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही. वर्ष 1969 मध्ये ‘रोमन कॅथलिक चर्च’ने संतांच्या दिनदर्शिकेतून व्हॅलेंटाईनचे नाव वगळले. रशियातील बेलग्रेड, अमेरिकेतील फ्लोरिडा विश्‍वविद्यालय, चीन, इटली, स्वीडन, नॉर्थ कोरिया, इथियोपिया आदी देशांत हा दिवस साजरा केला जात नाही; मग भारताच ‘व्हॅलेंटाईन डे’ कशासाठी ? केवळ युवकांना आकर्षित करत विविध कंपन्या स्वत:चा गल्ला भरत आहेत. या विरोधात हिंदूंनी शाळा- महाविद्यालयात जाऊन युवकांचे प्रबोधन केले पाहिजे आणि अशा जाहिरात करणार्‍या कंपन्यांना सनदशीर मार्गाने विरोध केला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’सारख्या कुप्रथा रोखण्यासाठी आपल्या युवापिढीला धर्मशिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक हर्षद खानविलकर यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘व्हॅलेंटाईन डे’ ची विकृती सोडा : भारतीय संस्कृती अंगीकारा !’ या ‘विशेष संवादात ते बोलत होते.

यावेळी बंगळुरू, कर्नाटक येथील व्यावसायिक स्वदेश प्रशांत म्हणाले की, 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत भारतीय युवा पिढीला ‘रोज डे’, ‘फ्रेंडशीप डे’, ‘चॉकलेट डे’, ‘व्हॅलेंटाईन डे’ आदी पाश्‍चात्त्य ‘डे’ साजरे करण्यास भाग पाडण्यामागे आर्थिक लूट करण्याचे आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मोठे षड्यंत्र आहे. यात शुभेच्छापत्रे, भेटवस्तू, चॉकलेट आदी बनवणार्‍या अनेक विदेशी कंपन्यांचा सहभाग असून या कंपन्यांकडून युवावर्गात ‘डे’ संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. पाश्‍चात्त्य ‘डे’च्या माध्यमांतून 12 ते 20 बिलियन डॉलर्सचा व्यवसाय केला जातो. हे आता केवळ काही ‘डे’पुरते मर्यादित राहिले नसून हिंदूंच्या दिवाळी आणि अन्य सणाला पारंपारिक भारतीय मिठाईऐवजी नातेवाईक अन् मित्र परिवाराला ‘कॅडबरी’ भेट द्या, अशा जाहिराती करून मोठी आर्थिक लूट केली जात आहे. यात आर्थिक लुटीसह भारतियांचे धर्मांतर करण्याचेही षड्यंत्र चालू आहे.

उत्तर प्रदेश येथील ‘सनातन एकता मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक पाठक म्हणाले की, हिंदु संस्कृती केवळ मानवावरच नव्हे, तर सर्वांवर प्रेम करण्यास शिकवते. मात्र तिचा अभ्यास नसल्यामुळे ‘डे’ संस्कृती ‘एन्जॉय’ करण्याच्या मागे लागलेला आजचा युवावर्ग हा शिक्षण अन् ब्रह्मचर्य सोडून भ्रामक प्रेमाच्या मागे पळत सुटला आहे. त्यामुळे त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक विकृती निर्माण होऊन त्यांचे आयुष्य वाया जात आहे. मुख्यत: मिशनरी शाळांतून पद्धतशीरपणे हिंदु संस्कार नष्ट केले जात आहेत. यावेळी भाजपचे चाळीसगाव येथील तालुकाध्यक्ष सुनील निकम म्हणाले की, ‘व्हॅलेंटाईन डे’ ही विकृतीच असून त्यामुळे युवक-युवतींचे जीवन धोक्यात आले आहे. या पाश्‍चात्त्य ‘डे’मधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन मिळत असून काही मुसलमान संघटना जाणीवपूर्वक हे पसरवत आहेत. या विरोधात हिंदूंनी जागृत झाले पाहिजे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!