विजयदुर्ग किल्ला दुरावस्थेप्रश्नी अधिवेशनामध्ये आवाज उठवणार : आ. वैभव नाईक
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आ. नाईक यांची भेट
कणकवली: विजयदुर्ग किल्ला दुरवस्था संदर्भात हिंदु जनजागृती समितीने मोहीम हाती घेतली आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन व्हावे यासाठी विविध माध्यमातून समिती आवाज उठवत आहे. याप्रश्नी आपणही लक्ष घालून अधिवेशनामध्ये आवाज उठवावा, असे निवेदन हिंदू जनजागृती समितीतर्फे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना देण्यात आले. या संदर्भात अधिवेशनामध्ये निश्चितपणे आवाज उठवू, अशी ग्वाही आ. नाईक यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना दिली.
यावेळी समितीचे जयवंत सामंत आणि मिलिंद पारकर उपस्थित होते. छत्रपती शिवराय आणि मराठा सरदारांच्या पराक्रमाची साक्ष असलेले अनेक किल्ले राज्यात असून त्यांची दुरावस्था झाली आहे. पुरातत्व विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. आपला हा ऐतिहासिक ठेवा सुरक्षित रहावा यासाठी हिंदू जनजागृती समितीने राज्यातील गडकोट संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ ग्रामपंचायतींमध्ये ठराव घेण्यात आले. विविध स्तरातील प्रतिष्ठीत आणि दुर्गप्रेमी यांच्या भेटी घेऊन हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात आला. विजयदुर्ग किल्ल्यावरही परिसरातील ग्रामस्थांनी निदर्शने केली. याविषयी ट्विटरवर ऑनलाइन ट्रेंडही चालविण्यात आला. तालुका पातळीवर तहसीलदारांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. त्याप्रश्नी शासनाच्या पातळीवर ठोस निर्णय व्हावा, म्हणून अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भेट घेण्यात येत आहे. या अंतर्गत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना भेटून यासंबंधीचे निवेदन सादर करण्यात आले.