भोगवे तेरवळेवाडीकडे जाणारी पायवाट बंद ; ५० लोकवस्तीचा संपर्क तुटला
शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष ; लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांनी प्रवास करायचा कसा ?
वेंगुर्ला (प्रतिनिधी)
कर्ली खाडी आणि समुद्र संगमाच्या ठिकाणी वसलेली भोगवे तेरवळे वाडी शासन आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अडचणीत आली आहे. या वाडीला जोडणारी पायवाट सागरी अतिक्रमणामुळे लुप्त झाली आहे. सागरी उधाणाच्या वेळी या पायवाटेवर तीन ते चार फुट पाणी येऊन हा मार्ग बंद होतो. या गंभीर समस्येकडे शासन लक्ष देणार का ? असा सवाल येथील ग्रामस्थानी केला आहे.
तेरवळे वाडी या वाडीची लोकसंख्या ५० च्या आसपास आहे. मात्र समुद्राच्या किनारून जाणारी येथील पायवाट खचली असून सागरी लाटांच्या तडाख्यामुळे ही पाय वाट लुप्त झाली आहे. त्यामुळे या वाडीचा गावाशी संपर्क तुटला आहे. सागरी उधाणात या पायवाटेवर तीन ते चार फुट पाणी येते. गावात लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक आहेत. त्यांनी प्रवास कसा करायचा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.