… तर त्याचवेळी भुयारी विद्युत वाहिनीसाठी आ. वैभव नाईक यांनी आवाज का नाही उठवला ?

विजय केनवडेकर यांचा सवाल ; त्यावेळी मालवण किनारपट्टी वरील भुयारी वीज वाहिनीला विरोध करण्यात तुमच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी पुढे 

मालवण शहरातील नियोजित भुयारी विद्युत वाहिन्यांच्या कामाचे श्रेय हे खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचेच

भुयारी विद्युत वाहिन्यांचे काम सुरु होणार हे लक्षात येताच स्वतःच्या नावाने बातम्या देऊन श्रेय घेण्याचा आ. नाईकांचा केविलवाणा प्रयत्न

मालवण | कुणाल मांजरेकर

केंद्र शासनाच्या दीनदयाळ विद्युत योजनेतून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी भुयारी विद्युत वाहिनी जोडण्यासाठी मालवण शहरात भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. ही योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणून कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला होता. यात ११० कि. मी. भुयारी विद्युत वाहिनी प्रकल्प मालवण शहरासाठी मंजूर झालेला होता. याचा निधी जिल्हा नियोजन कडे उपलब्ध झालेला होता. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचेच होते. असे असताना मालवण शहरासाठी दिलेल्या भुयारी विद्युत वाहिनीच्या प्रकल्पाचे दोन भाग करून मालवण शहरासाठी ३० किलोमीटर व सावंतवाडी शहरासाठी ९० किलोमीटर अशी करण्यात आली. असे होत असताना आमदार वैभव नाईक यांनी का आवाज उठवला नाही ? असा सवाल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोट्या मोठ्या वादळामुळे होत असलेल्या विद्युत समस्येबाबत खा. नारायण राणे यांनी दोन वर्षांपूर्वी भुयारी विद्युत वाहिनीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे दिला होता. तो मंजूर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरील सर्व गावांमध्ये भुयारी विद्युत वाहिनीच्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाला. हा निधी महाराष्ट्र विद्युत मंडळाकडे आठ महिन्यापूर्वी जमा झाला आहे. त्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे आता भुयारी विद्युत वाहिन्यांचे काम सुरु होणार हे लक्षात येताच स्वतःच्या नावाने बातम्या देऊन श्रेय घेण्याचा आ. वैभव नाईक यांनी केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे, अशी टीका देखील श्री. केनवडेकर यांनी केली आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी त्यावेळी केंद्र शासनाच्या दीनदयाळ विद्युत योजनेतून भुयारी विद्युत वाहिनी जोडण्यासाठी मालवण शहरात निधी उपलब्ध होऊनही सहा महिने ठेकेदार काम करत नव्हता. असे निदर्शनास येता प्रभू यांनी खास सभा बोलावून काम करण्याचे आदेश दिले. काम न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा दम देखील भरला होता. त्यानंतर मालवण शहरात काम सुरू झाले. असे असताना मालवण किनारपट्टीवरील भुयारी विद्युत वाहिन्या विरोध करणारे आपल्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी पुढे होते. त्यामुळे भुयारी विद्युत वाहिन्या ह्या केबलद्वारे पोल वरून नेण्यास भाग पाडले. मालवण शहरात मेढा भागामध्ये माजी नगरसेवक गणेश कुशे व उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी पुढाकार घेऊन भुयारी विद्युत वाहिनीचे काम सुरू करून घेतले व पूर्णत्वास नेले. यामुळे तोक्ते वादळामध्ये मालवण मेढा भागातील विद्युत वाहिन्यांची कोणतीही मोठी हानी न होता मेढा भाग पहिला दुरुस्त करण्यास यश विद्युत मंडळाला मिळाले होते. सावंतवाडी शहरात गेलेल्या निधीला सहा वर्षे होऊनही काम सुरूही झालेले नाही. त्याचवेळी जर आमदारानी पुढाकार घेतला असता तर मालवण शहर पूर्णपणे भुयारी विद्युत वाहिनेने जोडले गेले असते. ह्याच विद्युत वाहिन्या पोलवरून कार्यान्वित केल्यामुळे त्यामध्ये कार्बन व वाऱ्याच्या मोठ्या झोतामुळे वेळोवेळी केबल हलून आतमध्ये नादुरुस्त झालेली केबल बदलता येत नसल्यामुळे दोन दिवस धुरीवाड्यासारखा भाग पूर्णपणे अंधारात होता. 

खा. नारायण राणे यांनी निधी मंजूर करून आणल्यावर त्याला आवश्यक यंत्रसामुग्री ह्याच निधीतून जिल्ह्यामध्ये उपलब्ध झाली आहे. असे असताना काम का सुरू होत नाही म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना भाजपा मार्फत विचारणा करता भुयारी विद्युत वाहिनी टाकताना जो रस्ता, गटार याची खोदाई केली जाते व काम पूर्ण झाल्यानंतर ते परत आहेत असे करून देण्यासाठी जो निधी उपलब्ध व्हायला पाहिजे होता, तो निधीच उपलब्ध झाला नसल्यामुळे हे काम आम्ही करू शकत नाही. काम सुरू करायच्या आधी हा निधी नगरपालिकेकडे वर्गीकृत करावा लागतो व त्यांचा ना हरकत दाखला घ्यावा लागतो. तरच काम सुरू करता येते असे निदर्शनात आल्यानंतर मालवण कुडाळ विधानसभा संयोजक निलेश राणे यांच्या ही बाब निदर्शनात आणून दिली. यासाठी विशेष निधी जिल्हा नियोजन मधून द्यावा अशी मागणी निलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भेटून निवेदन देऊन केली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजनच्या सभेमध्ये खास बाब म्हणून हा निधी उपलब्ध करून दिला. 

खा. नारायण राणे यांनी विशेष सभा करून व निलेश राणे यांनी जिल्हा नियोजन मधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत मंजूर केलेला निधीमुळे पाऊस कमी झाल्यावर हे काम सुरू होणार हे लक्षात येताच भुयारी विद्युत वाहिनी प्रकल्प मंजूर करून निधी उपलब्ध अशा बातम्या देऊन प्रसिद्धी मिळवण्याचे काम व श्रेय घेण्याचे  केविलवाणा प्रयत्न आमदार वैभव नाईक करताना दिसत आहे. सुरेश प्रभू यांनी मालवण शहरासाठी खास करून भुयारी विद्युत वाहिनीसाठी निधी उपलब्ध करून देऊनही तो निधी दुसऱ्या तालुक्यात जात आहे, हे दिसल्यावर त्यासाठी वैभव नाईक यांनी विरोध का केला नाही ? भुयारी विद्युत वाहिनी प्रकल्प असताना पोलवरून का विद्युत वाहिन्या नेल्या याचा जाब अधिकाऱ्यांना का विचारला नाही ? याचे पण उत्तर श्रेय घेत असताना आमदारांनी दिले पाहिजे. 

भुयारी विद्युत वाहिन्यासाठी व आवश्यक ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी ॲक्शन प्लॅन प्रत्येक दिवसाचा तयार करण्याचे निर्देश व ११ केव्ही विद्युत लाईन थेट मालवण पर्यंत जोडण्यासाठी आवश्यक आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खा. नारायण राणे यांनी चर्चा करून मंडळाला आवश्यक असणारे आपत्कालीन विभागामार्फत देण्यात येणारे विद्युत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केल्यानंतर विद्युत साहित्य सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे विद्युत समस्येबाबत बऱ्याच प्रमाणात तक्रार निवारण होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे मालवण शहरात नियोजित भुयारी विद्युत वाहिन्याच्या कामाचे श्रेय हे खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व निलेश राणे यांचेच आहे, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!