… तर शिवसैनिक निलेश राणेंच्या पराभवाची हॅट्ट्रिक करतील ; हरी खोबरेकर यांचा इशारा

लोकसभा लढवणार की विधानसभा ते निश्चित करण्याचेही आव्हान

कुणाल मांजरेकर

मालवण : जेवल्यानंतर शिल्लक राहिलेल्या उष्ट्या पत्रावळी खाण्यात काही जणांना आनंद मिळतो, ती गत भाजपची झाली आहे. कुडाळमध्ये काही उष्ट्या पत्रावळी आपल्या गळाला लागल्याचा आनंद व्यक्त करताना भाजप नेते निलेश राणे यांनी आगामी निवडणूकीत वैभव नाईक यांचे डिपॉझिट जप्त करण्याची भाषा केली आहे. आम्ही शिवसैनिक त्यांना आव्हान देतो, निलेश राणेंनी विधानसभा लढवणार की लोकसभा ते निश्चित करावे, शिवसैनिक त्यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

येथील शिवसेना शाखेत ही पत्रकार परिषद झाली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, मंदार केणी, बाळू नाटेकर, प्रसाद आडवलकर आदींसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक सलग दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत. कुडाळ मध्ये काहींनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना उत्साह चढला आहे. मात्र या लोकप्रतिनिधीं सोबत एकही शिवसैनिक कुठेही गेलेला नाही. हे लोकप्रतिनिधी म्हणजे उष्ट्या पत्रावळी होते, त्या कोणी खाल्ल्या तर आम्हाला फरक पडत नसल्याची टीका हरी खोबरेकर यांनी केली. शिवसैनिक जोपर्यंत प्रामाणिकपणे शिवसेनेची एकनिष्ठ आहेत, तोपर्यंत शिवसेनेला हरवण्याची हिम्मत कुणातही नाही. मालवण तालुक्यात माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर आणि उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची मजबूत पकड असून आगामी काळातही संघटना यापेक्षाही अधिक बळकट केली जाईल, असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!